'शेवटच्या थेंबापर्यंत लढणार'
न्यूज18 रायझिंग भारत समिटमध्ये बोलताना शमी म्हणाला, मी नेहमी सांगतो, तुमच्याकडे जर कौशल्य असेल तर ते वाया घालवू नका. जर तुमच्या 'टँक'मध्ये अजून इंधन (Fuel) शिल्लक असेल, तर शेवटच्या थेंबापर्यंत त्याचा वापर करा आणि पुढे जात राहा. शमीच्या या विधानातून त्याची भारतीय जर्सी पुन्हा परिधान करण्याची ओढ स्पष्टपणे दिसून येत आहे.
advertisement
रणजी करंडकात शमीचा 'कहर'
नोव्हेंबर 2024 मध्ये दुखापतीतून सावरल्यानंतर शमीने घरगुती क्रिकेटमध्ये स्वतःला झोकून दिले आहे. रणजी करंडक 2025-26 च्या हंगामात बंगालकडून खेळताना त्याने आपली धार सिद्ध केली आहे.
सर्वोत्कृष्ट कामगिरी: जम्मू-काश्मीरविरुद्धच्या उपांत्य फेरीत 90 धावांत 8 बळी घेत त्याने कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली.
हंगामातील आकडेवारी: या हंगामातील 12 डावांत शमीने 36 विकेट्स घेतल्या असून, तो स्पर्धेत सर्वाधिक बळी घेणारा सहावा गोलंदाज ठरला आहे.
सातत्याने डावलले जात असल्याने प्रश्नचिन्ह
2025च्या सुरुवातीला चॅम्पियन्स ट्रॉफीच्या यशस्वी मोहिमेत शमीचा सहभाग होता. मात्र त्यानंतर त्याला टी-20 आणि कसोटी संघातून डच्चू देण्यात आला. वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या घरगुती कसोटी मालिका आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील मर्यादित षटकांच्या संघातही त्याला स्थान मिळाले नाही. वयाचा विचार करता शमी पाच दिवसांच्या क्रिकेटचे ओझे पेलू शकेल का, अशी शंका उपस्थित केली जात आहे.
निवडकर्त्यांच्या कोर्टात चेंडू
आपल्या टीकाकारांना उत्तर देताना शमी म्हणाला, देशाचे प्रतिनिधित्व करण्याची वेळ येईल तेव्हा मी माझे सर्वस्व पणाला लावेन. माझे काम मैदानावर कामगिरी करणे आहे, बाकी निर्णय निवडकर्त्यांच्या हातात आहे. मी फिट राहून टीम इंडियासाठी नेहमी उपलब्ध राहण्याचे ध्येय ठेवले आहे.
