भारताच्या फलंदाजीतील डावखुऱ्या फलंदाजांची संख्या आणि ऑफ-स्पिनविरुद्ध भारताने अलीकडे दाखवलेल्या अडचणी लक्षात घेता न्यूझीलंडकडून ऑफ-स्पिनर खेळवला जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र किवी संघाने ऑफ-स्पिनरला अंतिम संघात स्थान न देता वेगळाच निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारताच्या आघाडीच्या फलंदाजांना सुरुवातीला थोडा दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अभिषेक आणि इशानसाठी...
भारताच्या डावाची सुरुवात करणारे अभिषेक आणि इशान किशन यांच्यासाठी ही संघनिवड महत्त्वाची ठरू शकते. ऑफ-स्पिनर नसल्यामुळे अभिषेक शर्माला सुरुवातीच्या षटकांत जास्त मोकळेपणाने खेळण्याची संधी मिळू शकते.
advertisement
तज्ज्ञांच्या मते ज्याला संघात स्थान देण्यात आले आहे तो गोलंदाज अभिषेकला फारसा त्रास देऊ शकलेला नाही. त्यामुळे अभिषेकसाठी ही चांगली संधी ठरू शकते. मात्र इशान किशनला सावध राहावे लागेल, कारण संबंधित गोलंदाजाने त्याला यापूर्वी दोन वेळा बाद केले आहे.
पॉवरप्लेमध्ये ग्लेन फिलिप्सचा वापर?
न्यूझीलंडकडे ऑफ-स्पिनर नसल्यामुळे पॉवरप्लेमध्ये ग्लेन फिलिप्स याच्याकडून काही षटके टाकून घेतली जाऊ शकतात, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. जर तसे झाले तर अभिषेक शर्मा अधिक आक्रमक पवित्रा घेत क्रीज सोडून पुढे येत मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करू शकतो.
खेळपट्टीवर गवत, वेगवान गोलंदाजांना मदत?
सामन्यापूर्वी खेळपट्टीवर थोडेसे गवत दिसत असल्याने सुरुवातीला वेगवान गोलंदाजांना मदत मिळण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत न्यूझीलंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज मॅट हेन्री भारतीय फलंदाजांसाठी धोकादायक ठरू शकतो. हेन्री भारतीय फलंदाजांना मोठ्या अडचणीत टाकू शकतो. त्यामुळे भारतीय फलंदाजांनी सुरुवातीची काही षटके संयमाने खेळणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.
मोठ्या धावसंख्येची गरज
या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडसमोर आव्हान उभे करायचे असेल तर किमान 200 धावांच्या आसपासची धावसंख्या उभारणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
2016 पासून झालेल्या 14 टी२० विश्वचषक नॉकआउट सामन्यांपैकी 11 सामने (सेमीफायनल आणि फायनल) पाठलाग करणाऱ्या संघाने जिंकले आहेत. प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाच्या तीनही विजयांपैकी प्रत्येक विजय भारताचा आहे.
