हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ग्राउंड भरती प्रकिया सुरू असताना तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. पोलीस भरती सुरू असताना धावताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. पुरुषोत्तम बुरकुल असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव असून तो भरती प्रक्रियेसाठी पुण्यात आला होता. गेल्या काही दिवसांपासून पुण्यात उष्णतेचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे हा मृत्यू झालाय का? असा सवाल देखील विचारला जातोय.
advertisement
प्राथमिक वैद्यकीय तपासण्या करणं गरजेचं
ग्रामीण भागात बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर बहुतांश तरुणांचा कल पोलीस भरतीकडे असतो. पोलीस भरतीच्या तयारीसाठी तालुका पातळीवर जागोजागी अकॅडमी सुरू झालेल्या दिसून येतात. धावण्याच्या स्पर्धेत सहभागी होण्याआधी उमेदवारांनी काही प्राथमिक वैद्यकीय तपासण्या करणं गरजेचं आहे. जसं की हेमोग्लोबिन लेव्हल, ब्लड प्रेशर, हृदयाचे ठोके आणि ईसीजी इत्यादी, असं तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितलं आहे.
हायड्रेशन नॉर्मल ठेवणे गरजेचं
दरम्यान, ज्या दिवशी धावण्याची स्पर्धा असते, त्या दिवशी शरिरातील पाण्याची पातळी म्हणजेच हायड्रेशन नॉर्मल ठेवणे गरजेचे असते. उन्हामध्ये बराच वेळ उभा राहिल्यामुळे किंवा धावल्यामुळे डिहायड्रेशनचा धोका असतो. त्याचप्रमाणे शरिरातील इलेक्ट्रॉईटची पातळी देखील खालावते. या सर्व गोष्टींचा हृदयावर विपरित परिणाम होऊन बीपी कमी होणे किंवा हृदयविकाराचा झटका येणे, याचा धोका वाढतो, असंही डॉक्टरांनी म्हटलं आहे.
