शुभमन गिल हा भारताच्या वनडे आणि टेस्ट टीमचा कर्णधार आहे, पण टीम इंडियाच्या वनडे कॅप्टनलाच वनडे वर्ल्ड कपच्या टीममध्ये जागा मिळेल का नाही? याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. वनडे वर्ल्ड कपमध्ये विराट कोहली-रोहित शर्मा ओपनिंगला तर ऋतुराज गायकवाड तिसऱ्या आणि श्रेयस अय्यर चौथ्या क्रमांकावर खेळतील, असा दावा टीम इंडियाचा माजी ऑफ स्पिनर आर.अश्विनने केला आहे, त्यामुळे अश्विनच्या टीममध्ये कर्णधार शुभमन गिल यालाच जागा नाही.
advertisement
'तुम्ही 2027 मध्ये वनडे वर्ल्ड कप खेळणार आहात. श्रेयस अय्यर चौथ्या क्रमांकावर खेळतो, पण मॅनेजमेंट ऋतुराज गायकवाडलाही संधी देऊ शकते. ओपन कोण करणार ते मला माहिती नाही, पण या परिस्थितीमध्ये विराट आणि रोहित ओपन करतील त्यानंतर ऋतुराज आणि मग श्रेयस', असं अश्विन म्हणाला आहे.
शुभमन गिल हा भारताचा टेस्ट आणि वनडे टीमचा कर्णधार आहे, पण त्याला टी-20 टीममधून बाहेर करण्यात आलं आहे. गिलने भारताकडून 61 वनडे खेळल्या आहेत, यात त्याने 55 पेक्षा जास्तच्या सरासरीने आणि 99.02 च्या स्ट्राईक रेटने 2,953 रन केल्या आहेत. वनडे क्रिकेटमध्ये गिलच्या नावावर 8 शतकं ज्यात एक द्विशतक आणि 17 अर्धशतकं आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या मागच्या वनडे सीरिजमध्ये गिलने 3 पैकी 2 सामन्यांमध्ये अर्धशतकं केली होती.
विराट-रोहितचं रेकॉर्ड
ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या पहिल्या 2 वनडेमध्ये विराट शून्य रनवर आऊट झाला, त्यानंतर तिसऱ्या वनडेमध्ये विराटने अर्धशतक ठोकलं. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या 2 वनडेमध्ये विराटने 2 शतकं केली तर तिसऱ्या वनडेमध्ये अर्धशतक झळकावलं. विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळताना विराटने आंध्रविरुद्ध 131 आणि गुजरातविरुद्ध 77 रनची खेळीही केली.
न्यूझीलंडविरुद्धच्या सीरिजमध्ये विराटने पहिल्या सामन्यात 93 आणि तिसऱ्या सामन्यात 124 रन केले तर दुसऱ्या सामन्यात त्याने 23 रनची खेळी केली.
दुसरीकडे रोहितने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात 73 आणि 121 नाबाद रनची खेळी केली. तर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2 अर्धशतकं केली. मुंबईकडून विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळताना रोहितने सिक्कीमविरुद्ध शतक केलं तर उत्तराखंडविरुद्ध तो शून्य रनवर आऊट झाला. न्यूझीलंडविरुद्धच्या सीरिजमध्ये मात्र रोहितने निराशा केली. 3 सामन्यांमध्ये रोहितने 26, 24 आणि 11 रन केले.
