महाराष्ट्राविरुद्धच्या मोठ्या पराभवामुळे मुंबईच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. पहिले चार सामने जिंकल्यानंतर, विजय हजारे ट्रॉफीच्या नॉक आऊटमध्ये पोहोचण्यासाठी मुंबईला निश्चित विजयाची आवश्यकता होती, पण महाराष्ट्राविरुद्ध मुंबईला मोठा पराभव पत्करावा लागला. आता, मुंबईसाठी आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे. उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेला सरफराज खान दुखापतग्रस्त झाला आहे. सरफराज खान गेल्या वर्षीही अनेक वेळा दुखापतग्रस्त झाला होता.
advertisement
सरफराज खानला दुखापत
उत्तराखंडविरुद्ध अर्धशतक आणि गोव्याविरुद्ध विक्रमी शतक झळकावल्यानंतर, सरफराजला दुखापत झाली. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, सरफराजला त्याच्या मागील सामन्यात दुखापत झाली होती. सरफराजचे एमआरआय स्कॅन करण्यात आले आहे. सरफराजच्या दुखापतीची तीव्रता पाहता तो एकतर विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळू शकणार नाही, किंवा रणजी ट्रॉफीच्या दुसऱ्या टप्प्यातूनही बाहेर होईल. क्वाड इन्ज्युरीमधून बरं होण्यासाठी एक ते दोन आठवडे (ग्रेड-1) लागतात, पण दुखापत गंभीर असेल तर (ग्रेड-3) फिट व्हायला अनेक महिने लागू शकतात.
सरफराज खानला सतत दुखापत
सरफराज खानला वारंवार दुखापत होत आहे, 28 वर्षांच्या सरफराजला मागच्या 12 महिन्यात अनेड अडचणींना तोंड द्यावं लागलं. 2024-25 च्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीदरम्यान सरफराजची बरगडी फ्रॅक्चर झाली. या दुखापतीमुळे तो 2024-25 च्या रणजी ट्रॉफीच्या दुसऱ्या टप्प्यातही खेळू शकला नाही.
इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय टीममध्ये निवड न झाल्यानंतर सरफराजने त्याच्या फिटनेसवर लक्ष केंद्रित केलं. सरफराजने तब्बल 17 किलो वजन कमी केलं, पण 2025-26 च्या मोसमाआधी बुची बाबू स्पर्धेत खेळताना त्याच्या मांडीला (क्वाड्रिसेप्स) दुखापत झाली, त्यामुळे तो दुलीप ट्रॉफीमधूनही बाहेर झाला.
दुखापतीतून सरफराज सावरला आणि त्याने धमाकेदार कमबॅक केलं. त्याने टी-20 फॉरमॅटमध्ये पहिलं शतक झळकावलं, यानंतर आयपीएल लिलावामध्ये सीएसकेने त्याला विकत घेतलं. विजय हजारे ट्रॉफीमध्येही सरफराजने हा प्रभावी फॉर्म कायम ठेवला, पण आता त्याला पुन्हा एकदा दुखापत झाली आहे. सरफराज या हंगामात मुंबईच्या सर्वात विश्वासार्ह बॅटरपैकी एक आहे, त्याने तीन सामन्यांमध्ये 220 रन केल्या आहेत आणि मिडल ऑर्डरमध्ये त्याने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सरफराजच्या अनुपस्थितीमध्ये मुंबईच्या बॅटिंगवर परिणाम होऊ शकतो.
