क्रिकेट फक्त 11 खेळाडूंचा गेम
माझ्या वैयक्तिक विचारानुसार इम्पॅक्ट प्लेयर रूल क्रिकेटमध्ये नसावा. क्रिकेट हा फक्त 11 खेळाडूंचा गेम आहे. यामध्ये जर आपण एक्स्ट्रा बॉलर किंवा बॅटर खेळवला तर खेळातील महत्त्व आणि खेळाडूच्या कौशल्याचं महत्त्व कमी होतं, असं मत शुभमन गिलने व्यक्त केलं आहे. अतिरिक्त बॅटर खेळवण्याच्या सुविधेमुळे खेळाचे स्वरूप बदलत आहे. जेव्हा काही बॅटर लवकर आऊट होतात, तेव्हा डाव सावरण्यासाठी जे कसब लागते, ते या नियमामुळे आता लोप पावत चाललंय, असं मत देखील शुभमन गिल याने व्यक्त केलंय.
advertisement
मला फारसं आवडलेलं नाही - शुभमन गिल
एका जास्तीच्या खेळाडूमुळे मॅच आता 'वन डायमेंशन' होत चालली आहे, असं शुभमन गिलने स्पष्ट केलं. आव्हानात्मक पीचवर 160 किंवा 180 धावांचा पाठलाग करणं हे 220 धावांच्या डोंगरापेक्षा जास्त थरारक असतं. बॅटरसाठी सोप्या असलेल्या सपाट पीचवर मोठी धावसंख्या उभारणं मला वैयक्तिकरित्या फारसं आवडलेलं नाही, असंही तो यावेळी म्हणाला.
रोहित, हार्दिक पांड्यानेही उठवला आवाज
रोहित शर्मा, हार्दिक पांड्या आणि अक्षर पटेल यांच्यानंतर आता गिलनेही या नियमाविरुद्ध आवाज उठवला आहे. इम्पॅक्ट प्लेयरमुळे बॉल आणि बॅटमधील समतोल बिघडत असल्याचे अनेक खेळाडूंचे मत आहे. तरीही, चाहत्यांच्या मनोरंजनासाठी बीसीसीआयने हा नियम सध्या तरी हटवण्यास नकार दिला असून 2027 पर्यंत हाच पॅटर्न सुरू राहील. 2023 पासून पाच वर्षांसाठी हा नियम लागू करण्यात आला होता.
अंतिम निर्णय बोर्डाचाच असेल
दरम्यान, "बैठकीत आम्ही या विषयावर चर्चा केली, मात्र अंतिम निर्णय बोर्डाचाच असेल," असं देखील गिलने यावेळी नमूद केलं. सध्यातरी नाराज खेळाडूंना पुढील काही काळ या नियमासोबतच मॅचमध्ये उतरावे लागणार आहे. मात्र, बीसीसीआय आपला नियम मागे घेणार का? की आणखी दोन सीझन हा नियम पहायला मिळणार? असा सवाल विचारला जात आहे.
