अभिषेकची विकेट गेल्यानंतर टीम इंडियाचा दुसरा ओपनर इशान किशन 7 बॉलमध्ये 18 रन करून माघारी परतला. अभिषेक आणि इशान या दोघांची विकेट आर्यन दत्तने घेतली. अभिषेक आणि इशानची विकेट गेल्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांनी टीम इंडियाचा डाव सावरायला सुरूवात केली.
सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांनी पॉवर प्लेच्या 6 ओव्हरपर्यंत भारताचा स्कोअर 51 रनपर्यंत नेला. पॉवर प्ले संपल्यानंतर झालेल्या ड्रिंक्स ब्रेकमध्ये अखेर टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि 12 वा खेळाडू मोहम्मद सिराज मैदानात आले. यावेळी गौतम गंभीरने कर्णधार सूर्यकुमार यादवसोबत चर्चा केली.
advertisement
कॅप्टन सूर्याने बदलला गेम प्लान
गौतम गंभीर मैदानातून गेल्यानंतर टीम इंडियाने पुढच्या काही ओव्हरमध्ये सावध बॅटिंग केली. भारताने 7 व्या ओव्हरमध्ये 5 रन, 8 व्या ओव्हरमध्ये 4 रन, 9व्या ओव्हरमध्ये 9 रन आणि 10 व्या ओव्हरमध्ये 5 रन काढले. पुन्हा 11 व्या ओव्हरमध्ये टीम इंडियाला फक्त 2 रनच काढता आले. 12 व्या ओव्हरनंतर टीम इंडियाने पुन्हा गिअर बदलला. 12 व्या ओव्हरमध्ये भारताने 13 रन आणि 13 व्या ओव्हरमध्ये 19 रन काढल्या.
याआधी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातही गौतम गंभीरने डग आऊटमधून सूर्यकुमार यादवसाठी मेसेज पाठवला होता. शेवटपर्यंत मैदानात राहा, असं गौतम गंभीरने आपल्याला सांगितल्याचं स्वत: सूर्यकुमार यादव याने पाकिस्तानविरुद्धच्या मॅचनंतर सांगितलं होतं. आता नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यातही पहिल्या दोन विकेट लवकर गेल्यानंतर गंभीरने सूर्याला टिकून खेळायला सांगितल्याची शक्यता आहे.
टी-20 वर्ल्ड कपच्या युएसए, नामिबिया आणि पाकिस्तानविरुद्धच्या ग्रुप स्टेजच्या सामन्यात भारतीय टीमचा दणदणीत विजय झाला, त्यामुळे टीम इंडिया आधीच सुपर-8 मध्ये पोहोचली आहे. सुपर-8 मध्ये भारताचे सामने दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिजविरुद्ध होणार आहेत. सुपर-8 च्या या सामन्यांआधी अभिषेक शर्माचा फॉर्म हा टीम इंडियासाठी चिंतेचा विषय ठरला आहे.
2026 या वर्षात अभिषेक शर्माच्या नावावर 5 डक आहेत. जी ओपनरची टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासातली दुसरी सगळ्यात खराब कामगिरी आहे. पाकिस्तानचा सॅम अयुब हा टी-20 आंतरराष्ट्रीय मध्ये एका वर्षात सर्वाधिकवेळा शून्य रनवर आऊट होणारा ओपनर आहे. सॅम अयुब 2025 मध्ये 6 वेळा शून्य रनवर आऊट झाला होता.
