शेवटच्या ओव्हरपर्यंत थरारक झालेल्या या सामन्यात दोन क्षण असे आले जे टीम इंडियाच्या विजयाचे टर्निंग पॉईंट ठरले. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात अक्षर पटेलने फिल्डिंगमध्ये धमाका केला. अक्षरने आधी इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रुकचा 25 मीटर उलटा धावत जाऊन कॅच पकडला. जसप्रीत बुमराहने टाकलेल्या स्लो बॉलवर इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रुकचा अंदाज चुकला आणि बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने गेला, तेव्हा अक्षर पटेलने मागे धावत जाऊन उत्कृष्ट कॅच घेतला.
advertisement
यानंतर अर्शदीप सिंगच्या 14 व्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर विल जॅक्सने बाऊंड्रीच्या दिशेने बॉल मारला, तेव्हा अक्षर पटेल धावत आला आणि त्याने कॅच पकडला, पण आपण बाऊंड्री लाईनच्या बाहेर जात असल्याचं अक्षरला समजलं, त्यानंतर अक्षरने क्षणाचाही विलंब न लावता बॉल बाजूलाच असलेल्या शिवम दुबेच्या बाजून फेकला आणि दुबेनेही बॉल पकडला ज्यामुळे विल जॅक्सची विकेट गेली. विल जॅक्सने 20 बॉलमध्ये 35 रनची खेळी केली.
अक्षर पटेलने दोन वेळा मोक्याच्या क्षणी केलेल्या या फिल्डिंगमुळे अडचणीत सापडलेली टीम इंडिया बाहेर आली. टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव यानेही मॅचच्या निर्णायक टप्प्यावर जसप्रीत बुमराहच्या हातात बॉल दिला आणि बुमराहनेही कॅप्टनला निराश केलं नाही. आपल्या पहिल्याच बॉलला बुमराहने धोकादायक हॅरी ब्रुकची विकेट घेतली.
टीम इंडियाचा मोठा स्कोअर
या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रुकने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, त्यानंतर टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावून 253 रनपर्यंत मजल मारली. संजू सॅमसनने 42 बॉलमध्ये 211.90 च्या स्ट्राईक रेटने 89 रन केले, ज्यात 7 सिक्स आणि 8 फोरचा समावेश होता. याशिवाय शिवम दुबेने 25 बॉल 43, इशान किशनने 18 बॉल 39 रन केले.
