या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रुकने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, त्यानंतर टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 253/7 एवढा स्कोअर केला. संजू सॅमसनने 42 बॉलमध्ये 89 रनची खेळी केली, ज्यात 7 सिक्स आणि 8 फोर होत्या. संजूने 211.90 च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग केली. या कामगिरीबद्दल संजूला प्लेअर ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं.
advertisement
टी-20 वर्ल्ड कपच्या लागोपाठ दुसऱ्या सामन्यात संजू प्लेअर ऑफ द मॅच झाला आहे, याआधी सुपर-8 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या करो या मरोच्या सामन्यातही संजूने नाबाद 97 रन करून भारताला विजय मिळवून दिला.
संजूने कुणाला दिलं विजयाचं श्रेय?
'खूप छान वाटत आहे. मागच्या सामन्यापासून माझा फॉर्म चांगला असल्याची मला जाणीव होती, त्यामुळे मी स्वतःला थोडा जास्त वेळ दिला आणि त्याचा फायदा झाला. मला खेळ पुढे न्यायचा होता आणि शक्य तितक्या जास्त रन करायच्या होत्या', अशी प्रतिक्रिया संजू सॅमसनने दिली आहे.
'सेमी फायनलचा सामना आमच्यासाठी खूप चांगला झाला. परिस्थितीचे आकलन करणे महत्त्वाचे होते. आम्ही वानखेडे स्टेडियमवर खूप सामने खेळलो आहोत, त्यामुळे इथल्या परिस्थितीची आम्हाला चांगली माहिती आहे. आज टीमने ज्या पद्धतीने खेळ केला त्याबद्दल मला खूप आनंद आहे', असं संजू सॅमसन म्हणाला आहे.
'संपूर्ण श्रेय जसप्रीत बुमराहला जाते. वानखेडेवर खेळणे ही खरोखरच अविश्वसनीय भावना आहे. शतक करण्याचा विचार करून खेळायचे नसते; ते खेळाच्या प्रवाहात आपोआप येते. तुम्हाला फक्त सातत्याने आक्रमक खेळत राहावे लागते. टीमसाठी योगदान देता आले याचा मला खूप आनंद आहे', असं वक्तव्य संजू सॅमसनने केलं आहे.
बुमराहचा ड्रीम स्पेल
या सामन्यात टीम इंडियाच्या इतर बॉलर्सवर इंग्लंडचे खेळाडू आक्रमण करत होते, तेव्हा बुमराहने त्याच्या 4 ओव्हरमध्ये फक्त 33 रन देऊन धोकादायक हॅरी ब्रुकची विकेट घेतली. बुमराहने अत्यंत महत्त्वाच्या अशा 18 व्या ओव्हरमध्ये फक्त 6 रन देऊन भारताला विजयाच्या जवळ नेलं आणि त्यानंतर मॅचचं चित्र फिरलं.
