वर्ल्ड कपच्या सुपर-8 मध्येच आव्हान संपुष्टात आलेलं असलं तरी वेस्ट इंडिजची टीम अजून भारतामध्येच आहे. युएसए-इज्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे क्रिकेट टीमसाठी घरी जाणं कठीण झालं आहे. आखाती देशांमधली परिस्थिती चिघळली असल्यामुळे तिथल्या विमान सेवांवरही परिणाम झाला आहे. वेस्ट इंडिज टीमचा कोच डॅरेन सॅमी याने सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट केली आहे, ज्यात त्याने घरी जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. वेस्ट इंडिजची टीम घरी जायची वाट पाहत आहे, असं सॅमी म्हणाला आहे.
advertisement
1 मार्चला टीम इंडियाविरुद्ध 5 विकेटने पराभव झाल्यानंतर वेस्ट इंडिजचा टी-20 वर्ल्ड कपचा प्रवास तिथेच संपला, पण 4 दिवसांनंतरही वेस्ट इंडिजचे खेळाडू, सपोर्ट स्टाफ, कोच आणि इतर खेळाडू अजून भारतामध्येच आहेत.
मला घरी जायचं आहे
'मला फक्त घरी जायचं आहे...' अशी पोस्ट डॅरेन सॅमीने सोशल मीडियावर केली आहे. दुसरीकडे वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली आहे. खेळाडूंच्या सुरक्षित यात्रेसाठी आम्ही आयसीसी आणि संबंधित सरकारी अधिकाऱ्यांसोबत संपर्कात आहोत, असं वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने सांगितलं आहे. मिडल-इस्टमधल्या बिघडलेल्या परिस्थितीमुळे दुबई इंटरनॅशनल एअरपोर्ट आणि आखाती देशांमधील विमानसेवा प्रभावित झाली आहे.
वेस्ट इंडिजची टीम सध्या भारतामध्येच आहे, ते घरी जातील हे अजून स्पष्टपणे सांगू शकत नाही, अशी प्रतिक्रिया बीसीसीआयच्या सूत्रांनी पीटीआयला सांगितलं आहे. फक्त वेस्ट इंडिजच नाही तर झिम्बाब्वेची टीमही याच कारणामुळे भारतामध्ये आहे.
