विहान मल्होत्रा हा वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रे यांच्यासोबत ज्युनियर-लेव्हल क्रिकेट खेळत आहे. विहान मल्होत्राने वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रे यांच्यासाठी आपली ओपनिंगची जागा सोडली. इंग्लंड दौऱ्यापूर्वी विहान मल्होत्रा भारतीय अंडर-19 टीममधील स्थान गमावण्याच्या मार्गावर होता, त्याच्या बॅटमधून रनही येत नव्हत्या. इनिंगची सुरूवात करताना विहानला सतत अपयश येत होतं, त्यामुळे त्याला स्वतःची जागा वैभव आणि आयुषसाठी सोडावी लागली.
advertisement
इंग्लंड दौऱ्याच्या अगदी आधी, पटियाला येथील क्रिकेट हब अकादमीमध्ये सराव करताना मल्होत्राचे प्रशिक्षक कमलप्रीत संधू, ज्यांनी प्रभसिमरन सिंग, अनमोलप्रीत सिंग, नमन धीर आणि कनिका मल्होत्रा सारख्या खेळाडूंना प्रशिक्षण दिले आहे, त्यांनी विहान मल्होत्राला सांगितले की त्याने तक्रार करणे थांबवावे आणि त्याच्या नवीन भूमिकेवर काम करायला सुरुवात करावी.
'त्याने आयुष्यभर ओपनिंगला बॅटिंग केली आहे, तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंग करणे हा त्याच्यासाठी एक बदल होता. मी त्याला हे जाणवून दिले की वैभव आणि आयुषने आता सुरुवातीची जागा स्वतःची बनवली आहे. त्यांनी त्या स्थानावर उत्तम काम केले आहे, आता तुला वेगळा विचार करावा लागेल आणि स्वतःमध्ये बदल करावे लागतील. त्याने तिसऱ्या क्रमांकाचे स्थान स्वतःचे बनवावे', असं विहानचे प्रशिक्षक म्हणाले.
विहानची नाबाद अर्धशतकी खेळी
आशिया कप अंडर-19 मध्ये विहान मल्होत्राने चौथ्या क्रमांकावर बॅटिंग करताना 45 बॉलमध्ये नाबाद 61 रनची खेळी केली, यात त्याने 4 फोर आणि 2 सिक्स मारल्या. विहान आणि एरॉन जॉर्ज यांच्यात नाबाद 114 रनची पार्टनरशीप झाली, त्यामुळे भारताने श्रीलंकेचा 8 विकेटने पराभव केला. याचसोबत टीम इंडिया अंडर-19 आशिया कपच्या फायनलला पोहोचली आहे.
लक्ष्मणचा सल्ला
सेंटर ऑफ एक्सलन्सचे प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मणकडूनही विहान मल्होत्राला महत्त्वाचा सल्ला मिळाला, यानंतर विहानच्या कामगिरीमध्ये बदल झाला. विहानने 5 यूथ वनडेमध्ये 233 रन केले आणि दोन यूथ टेस्टमध्ये 277 रन करून ऑफ स्पिनने 3 विकेट पटकावल्या.
