27 ओव्हरचा खेळ शिल्लक असताना जिंकण्यासाठी 16 रन आणि हातात 5 विकेट असतील तर कोणीही बॅटिंग टीम ही मॅच जिंकेल, असं म्हणेल. पण एवढ्या मजबूत स्थितीमध्ये असतानाही मुंबईने त्यांच्या हातातून ही मॅच घालवली.
मुंबईने घालवली हातातली मॅच
जयपूरमध्ये झालेल्या या सामन्यात पंजाबने पहिले बॅटिंग करताना 216 रन केले. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या मुंबईने सावध सुरूवात केली. अंगकृष रघुवंशीने 23 आणि मुशीर खानने 21 रन केले, यानंतर सरफराजने 20 बॉलमध्ये 62 रनची वादळी खेळी केली. कर्णधार श्रेयस अय्यरनेही 45 रनचं योगदान दिलं, त्यामुळे मुंबई हा सामना सहज जिंकेल असं वाटत होतं, पण यानंतर सामना फिरला.
advertisement
सूर्यकुमार यादव 15, शिवम दुबे 12 आणि हार्दिक तमोरे 15 रनवर माघारी परतले. मुंबईला विजयासाठी 5 रनची गरज असताना त्यांच्या हातात 4 विकेट होत्या, पण मयंक मार्कंडे आणि गुरनूर ब्रारने मॅचचं चित्र बदलून टाकलं. एक-एक करत मुंबईचे बॅटर पॅव्हेलियनमध्ये परत जात होते. ओंकार तारमेळेची शेवटची विकेट घेऊन मयंक मार्कंडेने पंजाबला थरारक विजय मिळवून दिला.
मयंक-गुरनूर विजयाचे हिरो
मयंक मार्कंडे आणि गुरनूर ब्रार पंजाबच्या विजयाचे हिरो ठरले. मयंक आणि गुरनूर यांनी प्रत्येकी 4-4 विकेट घेतल्या. तर हरप्रीत ब्रार आणि हरनूर सिंग यांना एक-एक विकेट घेण्यात यश आलं. श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि सरफराज खान यांच्यासारखे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेले खेळाडू टीममध्ये असूनही मुंबईला पराभवाचा धक्का बसला.
पंजाबविरुद्धच्या सामन्यात मुंबईला पराभवाचा धक्का बसला असला तरी या दोन्ही टीम क्वार्टरफायनलसाठी क्वालिफाय झाल्या आहेत. मुंबईने ग्रुप सीमधून 7 पैकी 5 तर पंजाबने 7 पैकी 6 सामने जिंकले आहेत. मुंबई आणि पंजाबशिवाय दिल्ली, सौराष्ट्र, उत्तर प्रदेश, विदर्भ, कर्नाटक आणि मध्य प्रदेश या टीमही नॉक आऊट स्टेजला पोहोचल्या आहेत.
