रोजंदारीवरून शेतीकडे वळलेला प्रवास
झारखंडच्या रांची जिल्ह्यातील ओरमांझी गावात राहणाऱ्या संगीता देवी यांचे आयुष्य काही वर्षांपूर्वीपर्यंत अत्यंत साधे होते. त्या मजुरीवर काम करत आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न करत होत्या. मात्र ७० रुपयांमध्ये घरखर्च चालवणे कठीण जात होते. मुलांच्या भविष्यासाठी काहीतरी बदल घडवणे आवश्यक असल्याची जाणीव झाली आणि त्यांनी रोजंदारी सोडून शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला.
advertisement
अर्ध्या एकरावरून ७० एकरपर्यंतची वाटचाल
सुरुवात अत्यंत मर्यादित साधनांपासून झाली. संगीता आणि त्यांच्या पतीने अर्धा एकर जमीन भाड्याने घेऊन शेती सुरू केली. त्यांना सिंचनाच्या समस्येला सामोरे जावे लागले. मात्र त्यांनी हार न मानता ठिबक सिंचन आणि पॉलीहाऊस शेतीचे प्रशिक्षण घेतले आणि आधुनिक पद्धतीने शेतीला सुरुवात केली.
नवीन तंत्रज्ञानामुळे नफा वाढला
संगीता देवी आता वर्षातून तीन वेळा वेगवेगळी पिके घेतात. उन्हाळ्यात टरबूज, नंतर वाटाणा आणि हिवाळ्यात भाजीपाला असे पीकचक्र ठरले आहे. नव्या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे त्यांचा खर्च लक्षणीय प्रमाणात कमी झाला असून उत्पादन आणि नफा यामध्ये मोठी वाढ झाली आहे.
वार्षिक खर्च आणि उत्पन्न
संगीता देवी सध्या तब्बल ७० एकर शेती करतात. त्यासाठी त्यांचा अंदाजे खर्च १५ ते २० लाख रुपये इतका आहे. मात्र, यातून त्या दरवर्षी ५० ते ६० लाख रुपयांचे उत्पन्न मिळवतात. त्यांचे उत्पादन रांची, बोकारोसारख्या शहरांमध्ये तसेच रिलायन्स फ्रेशसारख्या मोठ्या नेटवर्कमध्ये विकले जाते.
सशक्त महिलांचा आदर्श
एकेकाळी शारीरिक श्रम करून पोट भरणाऱ्या संगीता देवी आज ग्रामीण भागातील महिलांसाठी प्रेरणास्थान ठरल्या आहेत. पुरुषप्रधान मानल्या जाणाऱ्या शेती क्षेत्रात त्यांनी यश मिळवून समाजात वेगळं स्थान निर्माण केलं आहे.
संगीता देवी यांची कहाणी ही केवळ यशाची नव्हे, तर जिद्दीची, दूरदृष्टीची आणि आधुनिकतेच्या समन्वयाची आहे. त्यांनी दाखवून दिलं की योग्य नियोजन, प्रशिक्षण आणि मेहनतीने कोणताही व्यवसाय यशस्वी करता येतो — मग तो शेतीचाच का असेना.
