प्रवास जो आयुष्याला वळण देऊन गेला
शालिनी अग्निहोत्री हिमाचल प्रदेशातील ऊना जिल्ह्यातील रहिवासी. वडील बसमध्ये कंडक्टर होते. एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेल्या शालिनीला आपण आयुष्यात काहीतरी मोठं व्हावं, असं नेहमीच वाटायचं. पण या विचाराला खरी धार एका प्रवासादरम्यान लागली.
शालिनी एकदा आपल्या आईसोबत प्रवास करत होत्या. त्या गर्दीत एका अनोळखी व्यक्तीने त्यांच्या आईशी अत्यंत गैरवर्तन केले आणि अपमान केला. आईचा तो केविलवाणा चेहरा आणि झालेला अपमान शालिनीच्या काळजाला चिरून गेला. त्या क्षणी त्यांना जाणीव झाली की, जर आपल्याकडे अधिकार असते, तर कुणीही आपल्या आईचा असा अपमान करण्याची हिंमत केली नसती. त्या दिवशी शालिनीने स्वतःशीच एक गाठ बांधली. अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी आपल्याला 'सक्षम' बनायचं आहे. हीच घटना त्यांच्या आयपीएस बनण्याच्या स्वप्नाची खरी मुहूर्तमेढ ठरली.
advertisement
कसं ठरलं UPSC करायचं?
शालिनी लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होत्या. त्यांनी दहावीत ९२ टक्के आणि बारावीत ७७ टक्के गुण मिळवून आपली चमक दाखवली होती. शालेय शिक्षणानंतर त्यांनी हिमाचल विद्यापीठातून कृषी शाखेत पदवी घेतली आणि त्यानंतर एम.एस्सी. पूर्ण केले. पदवी शिक्षण सुरू असतानाच त्यांच्या डोक्यात यूपीएससी (UPSC) परीक्षेचे चक्र सुरू झाले होते. त्यांना माहिती होते की, हे शिखर गाठणे सोपे नाही, विशेषतः एका कंडक्टरच्या मुलीसाठी जिथे सोयी-सुविधांचा अभाव होता.
महागडं कोचिंग न करता मिळवलं यश
आजकाल यूपीएससी म्हटले की दिल्लीला जाणे, लाखो रुपये खर्च करून कोचिंग क्लासेस लावणे, हे समीकरण मानले जाते. मात्र, शालिनी यांची आर्थिक परिस्थिती तशी नव्हती. वडिलांच्या तुटपुंज्या पगारात हे सगळं अशक्य होतं. पण त्यांनी हार मानली नाही. त्यांनी कोणत्याही कोचिंग क्लासशिवाय स्वतः अभ्यास करण्याचा निर्णय घेतला. इंटरनेटवरील साहित्याचा आधार घेत आणि रात्र-रात्र जागून त्यांनी पुस्तकांशी मैत्री केली.
IPS बनून स्वप्न केलं साकार
शालिनी यांच्या मेहनतीला २०११ मध्ये फळ आले. पहिल्याच प्रयत्नात त्यांनी २८५ वी रँक मिळवून आयपीएस (IPS) होण्याचा बहुमान मिळवला. पण त्या तिथेच थांबल्या नाहीत; २०१२ मध्ये त्यांनी पुन्हा ही परीक्षा उत्तीर्ण करून आपली गुणवत्ता सिद्ध केली. ज्या मुलीला एकेकाळी समाजाच्या नजरांनी आणि परिस्थितीने अडवण्याचा प्रयत्न केला होता, तीच मुलगा आज पोलिसांच्या वर्दीत अन्यायाविरुद्ध उभी आहे.
शालिनी अग्निहोत्रींची ही कथा केवळ एका यशाची कथा नाही, तर ती एका मुलीच्या धैर्याची आणि आईसाठी घेतलेल्या प्रतिभेची साक्ष आहे. त्यांची ही सक्सेस स्टोरी आज युपीएससीची तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. परिस्थिती कितीही कठीण असली, तरी जर तुमची जिद्द हिमालय एवढी मोठी असेल, तर तुम्ही कोणतंही शिखर सर करू शकता, हे शालिनीने जगाला दाखवून दिले आहे.
