परिवहन विभागाची करडी नजर
रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात वाहतूक नियमांची कडक अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. 2026 हे वर्ष राज्यभर 'दुचाकीचालक आणि पादचारी बचाव अभियान'म्हणून राबवले जाणार असून ठाणे परिवहन विभागाने या मोहिमेला सुरुवात केली आहे. आता हेल्मेट न घालता दुचाकी चालवणाऱ्यांवर तात्काळ दंडाची कारवाई होणार आहे.
महाराष्ट्रात 2025 मध्ये 36,450 अपघात झाले असून 15,549 जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी 57 टक्के मृत्यू दुचाकीस्वारांचे तर 21 टक्के पादचाऱ्यांचे आहेत. ही चिंताजनक परिस्थिती लक्षात घेऊन हेल्मेट वापर सक्तीचा करण्यात येणार आहे. नियम तोडणाऱ्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही असा इशारा प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी दिला आहे.
advertisement
शहरातील ज्या भागात आतापर्यंत अधिक अपघात घडतात तिथं विशेष लक्ष दिले जाणार आहे. वाहतूक पोलिस, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महापालिका यांच्या माध्यमातून रस्ते सुधारणा केली जाणार आहे. पादचाऱ्यांसाठी झेब्रा क्रॉसिंग, सुरक्षित पदपथ आणि योग्य प्रकाशयोजना यावर भर दिला जाईल.
अपघात रोखण्यासाठी महत्त्वाच्या मार्गावर कडक कारवाई
ठाणे-भिवंडी-पडघा-शहापूर मार्गावर विशेष मोहीम राबवण्यात येणार असून वेगमर्यादा तपासण्यासाठी रडारयुक्त इंटरसेप्टर वाहने तैनात केली जातील. सुरक्षित आणि जबाबदार वाहनचालकत्वातूनच अपघातांचे प्रमाण कमी होऊ शकते, असे प्रशासनाचे मत आहे.
