नेमकं काय घडलं?
ही युद्धनौका श्रीलंकेच्या गाले शहरापासून साधारण ४० समुद्री मैल अंतरावर असताना पहाटे साडेपाचच्या सुमारास अमेरिकेने हल्ला केला. अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर एखाद्या शत्रूचे जहाज टॉरपेडोने बुडवण्याची ही पहिलीच मोठी घटना असल्याचा दावा अमेरिकेने केला आहे.
भारताशी काय संबंध?
advertisement
धक्कादायक बाब म्हणजे, हे इराणी युद्धनौका १७ आणि १८ फेब्रुवारी रोजी विशाखापट्टणम इथे झालेल्या भारतीय नौसेनेच्या IFR 2026 या कार्यक्रमात सहभागी झाले होते. भारताच्या या मोठ्या सरावातून मायदेशी परतत असतानाच वाटेत अमेरिकेने या युद्धनौकेला टार्गेट केलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नुकतीच या ताफ्याची पाहणी केली होती, ज्यामध्ये हे जहाजही सामील होते.
श्रीलंकेच्या नौदलाने दिलेल्या माहितीनुसार जहाजावर एकूण १८० लोक होते. त्यापैकी फक्त ३२ जणांना वाचवण्यात यश आले आहे. ८७ जणांचे मृतदेह रुग्णालयात आणले गेले आहेत. सुमारे ६० लोक अजूनही बेपत्ता आहेत. २०२१ मध्ये इराणच्या ताफ्यात सामील झालेले हे जहाज पूर्णपणे इराणमध्ये बनवलेले होते. इराण याला विनाशक म्हणायचा. हे जहाज क्षेपणास्त्रे, मशीनगन्स आणि टॉरपेडो लॉन्चरने सज्ज होते. २०२३ मध्ये या जहाजाने संपूर्ण जगाला ३६० अंशात वळसा घालण्याचा विक्रमही केला होता.
आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन?
हा हल्ला श्रीलंकेच्या आर्थिक क्षेत्रात झाला आहे. आंतरराष्ट्रीय समुद्री कायद्यानुसार, शांततापूर्ण कारणांसाठी राखीव असलेल्या समुद्रात असा लष्करी हल्ला करणे वादाचा विषय ठरू शकतो. मात्र, अमेरिकेने स्वसंरक्षणाचे कारण पुढे करत इराणच्या लष्करी ताकदीला मोठा धक्का दिला आहे.
