इस्रायल-अमेरिका आणि इराण युद्धाची धग वाढत असताना दुसरीकडे मोठी अपडेट समोर आली आहे. जागतिक पातळीवर तेल आणि वायूच्या वाढत्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर इराणकडून एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. इराणने सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या 'स्ट्रेट ऑफ होर्मुज' (Strait of Hormuz) मधून जहाजांची वाहतूक सुलभ करण्याची घोषणा केली आहे. इराणने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला (UNSC) पाठवलेल्या पत्रात हा मार्ग उघडण्याची तयारी दर्शवली असली, तरी त्यासाठी काही कडक अटीही घातल्या आहेत. इराणच्या अटींचे पालन करणाऱ्या देशांच्या ऑईल-गॅस टँकरला होर्मुझमधून वाहतुकीस मुभा असणार आहे.
advertisement
इराणच्या 'या' अटी पाळाव्या लागणार
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, इराणने हा सागरी मार्ग उघडण्यासाठी काही अटी ठेवल्या आहेत. अमेरिका-इस्रायल आणि त्यांच्या मित्र देशाशी संबंधित जहाजांना या मार्गावरून जाण्यास पूर्णपणे बंदी असेल. ज्या देशांची जहाजे इराणविरोधी लष्करी कारवाईला पाठिंबा देत नाहीत, त्यांनाच या मार्गावरून जाण्याची परवानगी मिळेल. मात्र, त्यासाठी इराणी अधिकाऱ्यांशी समन्वय साधून 'सेफ्टी प्रोटोकॉल' पाळावे लागतील. इराणने स्पष्ट केले आहे की, ज्या देशांना ते 'आक्रमक' मानतात, त्यांच्यासाठी हा मार्ग बंदच राहील.
भारताची २० जहाजं अडकली, त्याचं काय होणार?
गेल्या काही दिवसांपासून होर्मुजची सामुद्रधुनी बंद असल्यामुळे भारताचे तेल आणि नैसर्गिक वायू, एलपीजीने भरलेले २० टँकर्स पश्चिम आशियात अडकून पडले आहेत. भारत सरकारच्या जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाचे विशेष सचिव राजेश सिन्हा यांनी मंगळवारी माहिती दिली की, २० भारतीय जहाजे चेकपॉईंट पार करण्यासाठी सज्ज आहेत. मात्र, ही जहाजे भारतात नेमकी कधी पोहोचतील, याबाबत अद्याप निश्चित वेळ सांगण्यात आलेली नाही. इराणच्या अटींवर भारत काय प्रतिक्रिया देणार, यावरही या २० जहाजाचं भवितव्य अवलंबून असणार आहे.
