इराण लावणार चार्ज
आता या नुकसानीची भरपाई करण्यासाठी इराणने जगातील सर्वात महत्त्वाच्या सागरी मार्गावर, म्हणजेच होर्मुजच्या सामुद्रधुनीवर चक्क टोल वसुली सुरू केल्याचे खळबळजनक वृत्त समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, होर्मुजच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या प्रत्येक व्यावसायिक जहाजाकडून इराण आता २० लाख डॉलर इतकी मोठी फी आकारत आहे. अमेरिकेसोबतच्या संघर्षामुळे इराणच्या अर्थव्यवस्थेला खिळ बसली असून, आपल्या देशातील वीज प्रकल्प आणि पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी इराण आता जगाकडून हा कर वसूल करत असल्याची चर्चा आहे. याला तेहरान टोल बूथ असं नावही दिल्याची चर्चा आहे.
advertisement
भारताचे टेन्शन का वाढले?
इराणच्या या निर्णयाचा सर्वाधिक फटका भारताला बसण्याची शक्यता आहे. कारण, भारत आपल्या गरजेच्या ५० टक्क्यांहून अधिक कच्च्या तेलाची आणि गॅसची आयात याच मार्गाने करतो. जर प्रत्येक जहाजाला १८ कोटी रुपये मोजावे लागले, तर साहजिकच कच्च्या तेलाच्या किमती वाढतील आणि भारतात पेट्रोल-डिझेल महाग होईल. होर्मुजची सामुद्रधुनी हा जगातील २०% तेल वाहतुकीचा एकमेव मुख्य मार्ग आहे, ज्यावर इराणचे भौगोलिक नियंत्रण आहे.
अमेरिकेच्या भूमिकेमुळे पेच वाढला?
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी इराणला दिलेला इशारा आणि त्यानंतर झालेलीOperation Epic Fury यामुळे इराण अधिकच आक्रमक झाला आहे. "जोपर्यंत अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे झालेले नुकसान भरून निघत नाही, तोपर्यंत हा मार्ग विनामूल्य खुला होणार नाही," असा पवित्रा इराणच्या काही लष्करी अधिकाऱ्यांनी घेतल्याचे समजते. यामुळे अमेरिकेने घेतलेली आक्रमक भूमिका आता जगासाठी आणि विशेषतः भारतसारख्या विकसनशील देशांसाठी 'डोक्याला ताप' ठरत आहे.
आंतरराष्ट्रीय कायद्याला केराची टोपली?
आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार कोणत्याही देशाला सागरी मार्गावर अशा प्रकारे शुल्क आकारता येत नाही. मात्र, इराणने या कायद्यांना न जुमानता वसुली सुरू केल्याने जागतिक व्यापार धोक्यात आला आहे. या आर्थिक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी आता जागतिक स्तरावर कोणत्या हालचाली होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
