नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, 'सौहार्दो परिवहन'ची ही बस राजबारीहून ढाकाकडे जात होती. संध्याकाळी ५ च्या सुमारास दौलतदिया फेरी टर्मिनल क्रमांक ३ वर बस फेरीमध्ये चढण्याचा प्रयत्न करत असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस वेगाने नदीच्या पात्रात कोसळली. बसमध्ये ४० ते ५० प्रवासी होते, ज्यातील अनेक जण बससोबतच पाण्यात बुडाले.
advertisement
'डोळ्यांदेखत पत्नी आणि मुलगा वाहून गेले'
या दुर्घटनेतून सुदैवाने बचावलेल्या अब्दुल अजीजुल या प्रवाशाने आपला टाहो फोडत सांगितले की, "मी कसाबसा पोहून काठावर आलो, पण माझी पत्नी आणि पोटचा मुलगा माझ्या डोळ्यांदेखत नदीत बुडाले." असेच अनेक प्रवासी आपल्या जवळच्या व्यक्तींना वाचवू शकले नाहीत. नदीकाठी जमलेल्या नातेवाईकांच्या आक्रोशाने संपूर्ण परिसर हेलावून गेला आहे.
बचाव कार्यात अडथळा
अपघात झाला तेव्हा अंधार पडू लागला होता, त्यामुळे बचाव कार्यात मोठ्या अडचणी आल्या. पोलीस इन्स्पेक्टर रसेल मुल्ला यांनी सांगितले की, रात्री उशिरापर्यंत २३ मृतदेह हाती लागले आहेत. अग्निशमन दल, नौसेना आणि पोलिसांनी मिळून 'हमजा' नावाच्या बचाव जहाजाच्या मदतीने ६ तासांच्या प्रयत्नानंतर बसला पाण्याबाहेर काढले. अद्यापही काही प्रवासी बेपत्ता असून शोधमोहीम सुरू आहे.
