हा संपूर्ण प्रकार घडला तेव्हा या महिलेचा 10 वर्षाच्या मुलगा तिच्यासोबत होता. त्याने हा संपूर्ण प्रकार आपल्या डोळ्यादेखत पाहिला ज्यामुळे तो फारच घाबरला आहे.
नक्की काय घडलं?
ही महिला घरातील लग्नासाठी आपल्या माहेरी जात होती. तिच्या सोबत तिचा लहान मुलगा देखील होता नागलोईहून मेट्रो घेतल्यानंतर ती इंद्रलोक मेट्रो स्टेशनवर पोहोचली. परंतू इंद्रलोक मेट्रो स्टेशनवरुन दुसरी मेट्रो घेणार होती, त्यावेळी महिलेची साडी मेट्रोच्या गेटमध्ये अडकली आणि मेट्रो पुढे जाऊ लागली. यामुळे महिला मेट्रोच्या फलाटावर लांबपर्यंत फरफटत गेली.
advertisement
यावेळी प्रवाशांनी स्थानकात आरडाओरडा केला. मात्र, मेट्रोचा दरवाजा उघडला नाही. मेट्रो ट्रेन फलाटाच्या पलीकडे गेली. तेव्हा तेथील गेटवर महिला धडकली आणि मेट्रो ट्रॅकवर पडली. त्यामुळे महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.त्यानंतर तिला सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे शनिवारी तिचा मृत्यू झाला.
हा अपघात महिलेचा 10 वर्षांचा मुलगा हितेंद्र याच्या समोरच घडला असून, या प्रकारामुळे तो घाबरला आहे.
हितेंद्रने सांगितले की तो त्याच्या आईसोबत मेरठला त्याच्या आजीच्या घरी लग्नाला जात होता. 13 वर्षांची बहीण रिया घरी होती. इंद्रलोक येथून ते मेट्रोने जात असताना हा अपघात झाला. आईची साडी मेट्रोच्या गेटमध्ये अडकली आणि मेट्रो पुढे जाऊ लागली. आई मेट्रोसोबत ओढत राहिली आणि तिला वाचवण्यासाठी तो मेट्रोसोबत धावत राहिला. पण, मेट्रो थांबली नाही की तिचे दार उघडले नाही.
तो पुढे म्हणाला, आई प्लॅटफॉर्मच्या शेवटच्या टोकाला पोहोचली तेव्हा ती लोखंडी जाळीला धडकली आणि रुळावर पडली. त्यानंतर आईला वाचवण्यासाठी त्याने मेट्रो ट्रॅकवर उडी घेतली. यानंतर मेट्रोचे कर्मचारी आले आणि त्यांनी आईला रुग्णालयात नेले. पीडितेच्या कुटुंबीयांचा आरोप आहे की अनेक रुग्णालयांनी महिलेला जखमी अवस्थेत दाखल करण्यास नकार दिला, ज्यामुळे वेळ निघून गेल्याने तिचा मृत्यू झाला.
पीडितेच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, रीना (वय 35) असे महिलेचे नाव आहे. नांगलोई येथील लोकेश सिनेमाजवळ नागलोई कॅम्पमध्ये ती आपल्या दोन मुलांसह भाड्याच्या घरात राहत होती. 2014 मध्ये पती रवीचे आजारपणामुळे निधन झाले होते.
तेव्हापासून रीना दिवसा घरांमध्ये साफसफाईचे काम करत असे. ती संध्याकाळी भाजी विकायची. तिचा नवराही भाजी विकायचा. पतीच्या निधनानंतर घराचा संपूर्ण खर्च ती एकटीच करायची. आता तिच्या मृत्यूनंतर दोन्ही मुलांची काळजी घेणारे कोणी नाही. आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी ती खूप मेहनत करत होती. मुलगा सहावीत तर मुलगी आठवीत शिकते.
सध्या पीडित कुटुंब दोन्ही अनाथ मुलांसाठी सरकार आणि दिल्ली मेट्रोकडे आर्थिक मदतीची विनंती करत आहे. जेणेकरून मुलांचे संगोपन करता येईल. पोलीस या प्रकरणाचा तपास घेत आहेत.