बेंगळुरू आणि गुरुग्राम सारख्या मोठ्या शहरांमधून समोर आलेले हे दृश्य केवळ गर्दीचे नाहीत, तर ते बेधुंद तरुणाईच्या विदारक वास्तवाचे आहेत.
बेंगळुरूमध्ये नेमकं काय घडलं?
बेंगळुरूच्या कोरामंगला आणि नाईटलाईफसाठी प्रसिद्ध असलेल्या भागातील अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. एका व्हिडिओमध्ये एक तरुणी अतिमद्यपानामुळे स्वतःला सावरू शकत नसल्याचे दिसत आहे. पोलीस आणि काही नागरिक तिला आधार देऊन गर्दीतून बाहेर काढत आहेत. तिची अवस्था पाहून सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये अनेक तरुणी दारुच्या नशेत मित्रांच्या किंवा अनोळखी व्यक्तींच्या आधाराने चालताना दिसत आहेत. काही ठिकाणी नागरिक त्यांना गर्दीपासून वाचवण्याचा आणि सावरण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.
advertisement
एका स्थानिक रहिवाशाने म्हटले की, "कोरामंगलामध्ये हे आता सामान्य झाले आहे. पूर्वी लोक अशा गोष्टींचे व्हिडिओ बनवून इंटरनेटवर टाकायला संकोचायचे, पण आजच्या 'जनरेशन z'ला (Gen Z) सर्व काही ऑनलाइन टाकायचे असते."
केवळ दक्षिण भारतच नाही, तर उत्तर भारतातही परिस्थिती काही वेगळी नव्हती. गुरुग्रामच्या सेक्टर 29 मधील व्हिडिओंमध्ये काही लोक मद्यधुंद अवस्थेत चक्क रस्त्याच्या कडेला पडलेले दिसत आहेत. रिकाम्या रस्त्यांवर रात्री उशिरापर्यंत तरुणांची दिशाहीन भटकंती सुरू होती. सायबर हब परिसरातील गर्दी पाहून एक युजर म्हणाला, "हे पाहूनच आता घाबरल्यासारखे होत आहे, त्यापेक्षा घरी राहून सुरक्षित सेलिब्रेशन केलेले कधीही चांगले."
"पाश्चात्य संस्कृतीचे अंधानुकरण?" सोशल मीडियावर वाद
हे व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी दोन गट पडले आहेत. काहींनी याला वैयक्तिक स्वातंत्र्य म्हटले असले, तरी बहुतांश लोकांनी या हुल्लडबाजीवर ताशेरे ओढले आहेत. "हा केवळ आनंद नाही, तर घराबाहेर जाऊन पार्टी करण्याचा एक सामाजिक दबाव आहे," असे एका युजरने नमूद केले. "आपण पाश्चात्य सण साजरे करण्याच्या नादात आपल्या मुळापासून आणि संस्कृतीपासून दूर जात आहोत," अशी टीका एकाने केली.
बेंगळुरूच्या एका रहिवाशाने संताप व्यक्त करत म्हटले की, "नम्मा बेंगळुरूसाठी हे अजिबात स्वीकारार्ह नाही. सार्वजनिक ठिकाणी अभद्र वर्तन करणाऱ्यांवर कडक पोलीस कारवाई आणि मोठा दंड आकारला पाहिजे." नवीन वर्षाचा उत्साह असणे स्वाभाविक आहे, पण या उत्साहात स्वतःचे भान विसरणे आणि सार्वजनिक शांतता भंग करणे कितपत योग्य आहे? हे व्हिडिओ केवळ एका रात्रीची हुल्लडबाजी नसून, बदलत्या जीवनशैलीचे आणि हरवत चाललेल्या शिस्तीचे निदर्शक आहेत. सेलिब्रेशनच्या नावाखाली आपली सुरक्षा धोक्यात येणार नाही, याची काळजी घेणे आता काळाची गरज बनली आहे.
