ही घटना पुरी जिल्ह्यातील जनकदेईपूर रेल्वे स्टेशनजवळ घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत मुलगा आपल्या मित्रांसोबत रेल्वे ट्रॅकवर रील शूट करत होता. तो रेल्वे पुलावरून चालत जाताना स्वतःचा व्हिडिओ रेकॉर्ड करत होता. दरम्यान, मागून अतिवेगाने धावणारी ट्रेन आली आणि त्याला धडक दिली.
अपघात इतका भीषण होता की जागीच त्याचा मृत्यू झाला. ट्रेन येत असल्याचं त्याला कळलंही नाही. त्याचे मित्र सुद्धा काही समजून घेण्याआधीच ट्रेन आली होती आणि त्यांचा मित्र त्यांच्या डोळ्यासमोरून कायमचा निघून गेला.
advertisement
पोलिसांनी सांगितलं की मुलाच्या हातात मोबाईल होता आणि त्याच मोबाईलमध्ये हा संपूर्ण अपघात रेकॉर्ड झाला आहे. व्हिडिओतून स्पष्ट झालं की रील बनवताना त्याचा हा अपघात झाला. त्यामुळे त्याच्या मित्रांवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.
या घटनेनंतर पुरी जिल्ह्यात सर्वत्र शोककळा पसरली आहे. भाऊबीजच्या दिवशी एका घराचं भवितव्य उजाडलं. पोलिसांनी लोकांना आवाहन केलं आहे की फक्त सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी आपलं आयुष्य धोक्यात घालू नये. तसेच रेल्वे ट्रॅक किंवा प्रतिबंधित भागात व्हिडिओ शूट करणे हा कायद्याने गुन्हा आहे आणि तो जीवघेणा धोकाही असतो, हेही स्पष्ट केलं आहे.
रेल्वे पोलिसांनी या घटनेनंतर शाळा आणि रेल्वे स्थानकांवर जागरूकता मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितलं की तरुणांना सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर करण्याबाबत शिक्षण दिलं जाईल. स्थानिक लोकांनीदेखील ही घटना “सोशल मीडियाच्या अंध स्पर्धेचं फळ” असल्याचं म्हटलं आहे आणि पालकांना आपल्या मुलांच्या ऑनलाइन सवयींवर लक्ष ठेवण्याचं आवाहन केलं आहे.
अलीकडच्या काही महिन्यांत देशभरात ‘धोकादायक रील्स’ बनवण्याच्या नादात जीव गमावणाऱ्या तरुणांची संख्या वाढली आहे. चालत्या वाहनावर स्टंट करणे, उंच इमारतींवरून व्हिडिओ बनवणे किंवा रेल्वे ट्रॅकवर पोझ देणे. हा ट्रेंड हळूहळू एक “वर्च्युअल अॅड्रेनालिन रश” बनला आहे.
तज्ज्ञांचं म्हणणं आहे की लाईक्स आणि व्ह्यूजच्या मोहात पडून तरुण खऱ्या धोक्याचं भान हरवतात. जनकदेईपूरमधील ही घटना पुन्हा एकदा आठवण करून देते की एका क्षणाचं रोमांच कधी कधी आयुष्यभराचं दु:ख ठरू शकतं. रील्स बनवणं चुकीचं नाही, पण सुरक्षेचं भान ठेवणं अत्यावश्यक आहे.
