फुटपाथवर फुगे विकणारा बनला 57,000 कोटीचा मालक, MRFचे मॅम्मेन मप्पिलाईंची प्रेरणादायी कहाणी
- Published by:Kranti Kanetkar
- trending desk
Last Updated:
कठीण आव्हानांमध्ये माम्मेन यांनी आपल्या भावंडांसोबत फुगे विकण्यास सुरुवात केली. काही वेळा त्यांनी सेंट थॉमस चर्चमध्ये रात्र काढली पण, माघार घेतली नाही.
मनामध्ये जिद्द आणि निर्धार असेल तर कोणतीही व्यक्ती असंख्य अडथळे पार करून ध्येय साध्य करू शकते, ही बाब आतापर्यंत अनेक यशस्वी लोकांनी सिद्ध करून दाखवली आहे. त्यामध्ये मद्रास रबर फॅक्टरी म्हणजेच एमआरएफ या कंपनीच्या मालकाचा ही समावेश होतो. केएम माम्मेन मप्पिलाई हे एमआरएफचे संस्थापक आहेत. त्यांनी रबरी फुगे विकून आपल्या व्यवसायाला सुरुवात केली होती. लवकरच ते भारतातील टायर व्यवसायाचा चेहरा बनले. सध्या विराट कोहलीसारखा स्टार क्रिकेटर त्याच्या कंपनीचा ब्रँड ॲम्बेसेडर आहे. काही वर्षांपूर्वी सचिन तेंडुलकर देखील एमआरएफचा ब्रँड ॲम्बेसेडर होता.
मप्पिलाई यांची गोष्ट 1922 मध्ये सुरू होते. केरळमधील ख्रिश्चन कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता. त्यांचे वडील मोठे व्यावसायिक होते. त्यांचा बँक आणि वर्तमानपत्राचा व्यवसाय होता. मात्र, त्यांच्या वडिलांना एका प्रकरणात दोषी ठरवल्यानंतर त्रावणकोरच्या राजघराण्याने त्यांची मालमत्ता जप्त केली. त्यावेळी माम्मेन हे मद्रास ख्रिश्चन कॉलेजमध्ये शिकत होते. त्याच्या वडिलांना दोन वर्षे तुरुंगवास भोगावा लागला. वडील तुरुंगात गेल्यानंतर कुटुंब रस्त्यावर आलं. कठीण आव्हानांमध्ये माम्मेन यांनी आपल्या भावंडांसोबत फुगे विकण्यास सुरुवात केली. काही वेळा त्यांनी सेंट थॉमस चर्चमध्ये रात्र काढली पण, माघार घेतली नाही.
advertisement
1952 मध्ये माम्मेन यांच्या लक्षात आलं की, एक परदेशी कंपनी टायर रिट्रेडिंग प्लँटला ट्रेड रबर पुरवत आहे. अशा प्रकारे त्यांच्या मनात ट्रेड रबर कारखाना सुरू करण्याची कल्पना आली. त्यांनी आपल्याकडील सर्व बचत वापरून ट्रेड रबर बनवण्याच्या व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला. अशा प्रकारे मद्रास रबर फॅक्टरीचा जन्म झाला. ट्रेड रबर बनवणारी ही भारतातील पहिली कंपनी होती. त्यावेळी भारतात स्वदेशी रबर उत्पादक कंपनी नव्हती. माम्मेन यांची परदेशी कंपन्यांशी थेट स्पर्धा होती. 1956 पर्यंत, एमआरएफ कंपनीने टायर व्यवसायात 50 टक्के भाग व्यापला होता.
advertisement
1960 हे वर्ष माम्मेन यांच्या व्यवसायासाठी एक टर्निंग पॉइंट ठरलं. एमआरएफ कंपनी ट्रेड रबर व्यवसायासह टायर मार्केटमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत होती. त्यांनी अमेरिकेतील मॅन्सफिल्ड टायर आणि रबर कंपनीकडून तांत्रिक साहाय्य घेतले व भारतात टायर निर्मिती युनिटची स्थापना केली. माध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या वृत्तांनुसार, देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांनी 1961 मध्ये टायर कारखान्याचं उदघाटन केलं होते. 1961 मध्ये एमआरएफ कारखान्यात पहिलं टायर तयार झालं. त्याच वर्षी माम्मेन यांनी आपल्या कंपनीचा आयपीओ आणला होता.
advertisement
टायर उद्योगातील योगदानाबद्दल 1992 मध्ये भारत सरकारने माम्मेन मप्पिलाई यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं होतं. 2003 मध्ये त्याचं निधन झालं. सध्या एमआरएफ हा टायर उद्योगातील जगातील दुसरा सर्वात मोठा ब्रँड आहे. त्याचं मार्केट कॅपिटल 57 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहली हा ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून एमआरएफशी संलग्न आहे. कंपनीचं मुख्यालय चेन्नई येथे आहे. ही कंपनी आता टायर, धागे, ट्युब, कन्व्हेअर बेल्ट, पेंट आणि खेळणी यासह इतर रबर प्रॉडक्ट्सचं उत्पादन करते.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 06, 2024 10:43 AM IST
मराठी बातम्या/करिअर/
फुटपाथवर फुगे विकणारा बनला 57,000 कोटीचा मालक, MRFचे मॅम्मेन मप्पिलाईंची प्रेरणादायी कहाणी


