पाणी वाया का घालवतोयस? नळ बंद करायला सांगितल्याने सुरक्षा रक्षकाची हत्या, डोंबिवली हादरलं
- Published by:Prachi Amale
Last Updated:
डोंबिवली पश्चिमेकडील कोपर परिसरात घडली असून या घटनेत उमेश वाघ या सुरक्षा रक्षकाचा दुर्दैवी मृत्यू झाला
डोंबिवली: दुष्काळाच्या सावलीत पाण्याचा थेंब न थेंब वाचवण्यासाठी धडपड सुरू असताना डोंबिवलीत मात्र पाणी वाया घालवू नका असे सांगणाऱ्या एका कर्तव्यदक्ष सुरक्षा रक्षकाला आपला जीव गमवावा लागला आहे. नळ उघडा ठेवून पाणी वाया का घालवतो? असा जाब विचारल्याच्या रागातून एका तरुणाने सुरक्षा रक्षकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना डोंबिवली पश्चिमेकडील कोपर परिसरात घडली आहे. या घटनेत उमेश वाघ या सुरक्षा रक्षकाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
मिळालेली माहिती अशी की, डोंबिवली पश्चिमेतील कोपर परिसरातील अण्णाभाऊ साठे नगरमध्ये ही खळबळजनक घटना घडली. आरोपी अक्षय जाधव हा नळ सुरू ठेवून मोठ्या प्रमाणात पाणी वाया घालवत होता. हे दृश्य तिथे कार्यरत असलेले सुरक्षा रक्षक उमेश वाघ यांच्या निदर्शनास आले. त्यांनी सामाजिक भान राखत अक्षयला नळ बंद करण्यास सांगितले आणि 'पाणी वाया का घालवतोयस?' असा जाब विचारला.
advertisement
नेमका वाद काय झाला?
एका छोट्या सूचनेवरून अक्षय जाधव याचा पारा चढला. त्याने उमेश वाघ यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. हा वाद इतका विकोपाला गेला की, संतापाच्या भरात अक्षयने उमेश वाघ यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात वाघ हे रक्ताच्या थारोळ्यात पडले आणि गंभीर जखमी झाले. घटनेनंतर त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र दुर्दैवाने उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
advertisement
आरोपीला 16 मार्चपर्यंत पोलीस कोठडी
घटनेची माहिती मिळताच विष्णूनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपी अक्षय जाधव याला ताब्यात घेऊन अटक केली. बुधवारी त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला 16 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेमुळे डोंबिवलीत संतापाची लाट उसळली असूनल एका कर्तव्यनिष्ठ कर्मचाऱ्याचा अशा प्रकारे बळी गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
advertisement
कल्याण- डोंबिवली शहराला स्मार्ट सिटी म्हणून संबोधलं जातं. हे सध्या शहर स्मार्ट सिटीच्या उंबरठ्यावर असताना नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अशातच उन्हाळ्याचे दिवस सुरू आहे. ऐन उन्हाळ्यातच महानगर पालिकेकडून नागरिकांना पाणी व्यवस्थित सोडले जात नसल्यामुळे नागरिकांचा संताप वाढू लागला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 11, 2026 8:15 PM IST
मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
पाणी वाया का घालवतोयस? नळ बंद करायला सांगितल्याने सुरक्षा रक्षकाची हत्या, डोंबिवली हादरलं







