Health Tips: पावसाळ्यात गरमागरम भजी खाताय? आधी हे पाहा, ती चूक कधीच करणार नाही!
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Health Tips: पाऊस सुरू झाला की गरमागरम भजी सर्वांना खावीशी वाटतात. पण भजी खाणं आरोग्यासाठी चांगलं की धोकादायक जाणून घेऊ.
मुंबई: पावसाळा सुरू झाला की गरमागरम चहा आणि तळलेली भजी सर्वांनाच हवीहवीशी वाटतात. त्यामुळे रस्त्याच्या कडेला गाड्यावर थांबून अनेकजण कांदाभजी, मिरची भजींवर ताव मारतात. मात्र, आरोग्यतज्ज्ञांच्या मते पावसाळ्यात भजीसारखे तळलेले पदार्थ टाळणं आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतं.
हवामानातील बदलांमुळे पावसाळ्यात वातावरणात दमटपणा वाढतो. त्यामुळे पचनक्रिया मंदावते आणि शरीराची रोगप्रतिकारक शक्तीही कमी होते. अशा वेळी भजीसारखे तेलकट आणि जड पदार्थ पचायला कठीण जातात. अपचन, अॅसिडिटी, गॅस आणि जुलाब यांसारख्या समस्या त्यामुळे निर्माण होऊ शकतात.
लठ्ठपणाचा धोका
पावसाळ्यात तेल लवकर खराब होतं आणि तळण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तेलाचा दर्जाही कमी असतो. बऱ्याचदा एकाच तेलात वारंवार तळणं होतं, ज्यामुळे त्यामध्ये ट्रान्स फॅट्स निर्माण होतात. हे ट्रान्स फॅट्स हृदयविकार, कोलेस्टेरॉल वाढ, व तसेच लठ्ठपणास कारणीभूत ठरू शकतात, असं तज्ज्ञ सांगतात.
advertisement
जंतुसंसर्गाचा धोका
पावसात साठलेल्या पाण्यामुळे भाज्या किंवा पीठामध्ये जंतुसंसर्ग होण्याची शक्यता असते. अशा अन्नामुळे फूड पॉइझनिंग किंवा इतर संसर्गजन्य आजार होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे आरोग्यासाठी पावसाळ्यात ताजं, उकडलेलं, कमी तेलकट आणि पोषक अन्न खाणं उपयुक्त ठरतं.
पावसाची मजा ही केवळ खाण्यातच नाही, तर आरोग्य सांभाळत ती अनुभवण्यातही आहे. त्यासाठी मोहाला थोडा आवर घालून पावसाळ्याचा आनंद घ्यावा. भजी खायचीच असेल तर ती घरच्या घरी बनवावीत. तसेच स्वच्छतेची काळजी घेऊन आणि कमी तेलात ताजी करून खावी, असे आहारतज्ज्ञ सांगतात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 12, 2025 2:22 PM IST