आता उपवासाचं टेन्शन सोडा, ही रेसिपी बनवा अन् वर्षभरात कधीही खावा रताळं, Video
- Published by:News18 Marathi
- Reported by:Amita B Shinde
Last Updated:
उपवासाला रताळे खाल्ले जाते. त्यामुळे आपण वर्षभर टिकणारी रताळ्याची खास रेसपी बनवू शकता.
अमिता शिंदे, प्रतिनिधी
वर्धा: उपवासाला अनेक जण रताळी खातात. मात्र रताळे वर्षभर उपलब्ध नसते. त्यामुळे रताळ्याच्या वड्या बनवून स्टोअर करून ठेवता येतात. विशेष म्हणजे वड्या बनविण्यासाठी केवळ रताळी लागतात. त्यात तिखट मिठाचीही गरज नसते. तर या वड्या नेमक्या कशा करतात? याबाबत वर्धा येथील गृहिणी शोभाताई मकेश्वर यांनी माहिती दिली आहे.
रताळ्याची वडी बनवण्याचे साहित्य
रताळ्याची वडी बनवण्यासाठी केवळ रताळे आवश्यक आहेत. त्यासाठी इतर कोणत्याही पदार्थाची आवश्यकता नसते.
advertisement
रताळ्याची वडी बनवायची कशी?
सर्वप्रथम हवी तेवढी रताळी स्वच्छ धुवून घ्यायची आहेत. कूकर मध्ये 2 शिट्या होईपर्यंत वाफवून घ्यायचे.थंड झाल्यावर छान एकजीव करून घ्या. त्यात गुठळ्या राहता कामा नये आणि त्याच्या मुगाच्या वड्यांप्रमाणे वड्या पाडून घ्या. आता या वड्या तुम्ही जाड किंवा लहान सुद्धा टाकू शकता. छान वाळल्यावर त्याचा आकार लहान होतो. त्यामुळे अनेकजण मध्यम ते मोठया आकाराच्या वड्या घालणे पसंत करतात. या वड्या आता कडक उन्हात वाळत ठेवायच्या आहेत. वड्या चांगल्या वाळायला पाहिजे, अन्यथा आतून खराब होऊन बुरशी लागू शकते, असे मकेश्वर सांगतात.
advertisement
खरंतर रताळ्याच्या वड्या पूर्वीच्या काळापासून विदर्भात बनविल्या जातात. आताही ही परंपरा कायम असल्याचं दिसून येतं. अशाप्रकारे अगदी कमी वेळात वर्षभर टिकणाऱ्या या रताळ्याच्या वड्या बनवून ठेवता येतील. त्या गरजेनुसार कधीही खाता येतात. त्यामुळे ही रेसिपी आपणही नक्की ट्राय करू शकता.
Location :
Wardha,Maharashtra
First Published :
April 09, 2024 5:47 PM IST