भारतात रविवारचीच बहुतेकांना सुट्टी का मिळते? काय आहे यामागचं कारण, इतिहास तुम्हाला आश्चर्यचकीत करेल
- Published by:Devika Shinde
Last Updated:
एकेकाळी आपल्या पूर्वजांना आठवड्याचे सातही दिवस, अहोरात्र काम करावं लागायचं. त्यांना 'वीकेंड' नावाचा कोणताही प्रकार माहित नव्हता. मग ही रविवारची हक्काची सुट्टी नेमकी सुरू कशी झाली? यामागे एका मराठी माणसाचा 7 वर्षांचा संघर्ष दडला आहे. चला, आज जाणून घेऊया रविवारच्या सुट्टीचा रंजक इतिहास.
मुंबई : शनिवारची संध्याकाळ झाली की आपल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक येते का? कारण उद्या 'रविवार' आहे. रविवार म्हटलं की सुट्टीचा दिवस, उशिरा उठणं, चमचमीत जेवण, कुटुंबासोबत गप्पा आणि कामाचा कोणताही ताण नसलेला निवांत दिवस. पण, तुम्ही कधी विचार केला आहे का, की ही आठवड्याची सुट्टी रविवारीच का मिळते आणि असा सुट्टीचा दिवस असावा हे कोणं ठरवलं?
एकेकाळी आपल्या पूर्वजांना आठवड्याचे सातही दिवस, अहोरात्र काम करावं लागायचं. त्यांना 'वीकेंड' नावाचा कोणताही प्रकार माहित नव्हता. मग ही रविवारची हक्काची सुट्टी नेमकी सुरू कशी झाली? यामागे एका मराठी माणसाचा 7 वर्षांचा संघर्ष दडला आहे. चला, आज जाणून घेऊया रविवारच्या सुट्टीचा रंजक इतिहास.
गिरणी कामगारांचा संघर्ष आणि नारायण मेघाजी लोखंडे
ब्रिटिश राजवटीत भारतात औद्योगिक क्रांती होत होती, पण कामगारांची स्थिती अत्यंत वाईट होती. विशेषतः मुंबईतील गिरणी कामगारांना आठवड्याचे सातही दिवस काम करावे लागायचे. सुट्टी किंवा आरामाचा कोणताही अधिकार त्यांना नव्हता.
advertisement
अशा परिस्थितीत, नारायण मेघाजी लोखंडे हे नाव समोर आले. त्यांना भारतीय कामगार चळवळीचे जनक मानले जाते. लोखंडे यांनी कामगारांचे हाल पाहिले आणि त्यांना जाणीव झाली की, शरीराला आणि मनाला विश्रांतीची गरज आहे. त्यांनी 1881 पासून सुट्टीसाठी मागणी सुरू केली. हा लढा सोपा नव्हता; तब्बल 7 वर्षे त्यांनी निदर्शनं केली, ब्रिटीश सरकारला निवेदने दिली आणि 10,000 हून अधिक कामगारांना एकत्र केले. अखेर, त्यांच्या दबावामुळे 10 जून 1890 रोजी ब्रिटीश सरकारने अधिकृतपणे रविवार हा सुट्टीचा दिवस म्हणून घोषित केला.
advertisement
रविवारच का निवडला गेला?
रविवारची निवड करण्यामागे धार्मिक आणि प्रशासकीय अशी दोन्ही कारणे होती
ब्रिटिश परंपरा: भारतात राज्य करणारे ब्रिटीश अधिकारी ख्रिश्चन धर्मीय होते. ख्रिश्चन धर्मात रविवार हा प्रार्थनेचा पवित्र दिवस मानला जातो. त्यामुळे ब्रिटिशांनी त्यांच्या सोयीसाठी हा दिवस निवडला.
नारायण मेघाजी लोखंडे यांनी भारतीयांसाठी एक विशेष तर्क मांडला. त्यांनी सांगितले की, रविवार हा 'खंडोबा' या देवतेचा आणि 'सूर्य देवाचा' वार आहे. ज्याप्रमाणे इंग्रजांना त्यांच्या धर्मासाठी सुट्टी हवी, तसाच हक्क भारतीय कामगारांनाही आपल्या समाजासाठी आणि देवासाठी मिळायला हवा.
advertisement
रविवारच्या सुट्टीचा उगम तसा खूप जुना आहे. इसवी सन 321 मध्ये रोमन सम्राट कॉन्स्टन्टाईन द ग्रेट याने पहिल्यांदा रविवारी सुट्टी जाहीर केली होती. कालांतराने ही प्रथा संपूर्ण युरोपमध्ये पसरली आणि ब्रिटिशांमार्फत ती भारतात पोहोचली. मात्र, भारतात ती सर्वसामान्यांना आणि कामगारांना मिळवून देण्याचे श्रेय मात्र नारायण मेघाजी लोखंडे यांच्या संघर्षालाच जाते.
advertisement
आज आपण ज्या रविवारी आरामात घरी बसतो, तो दिवस प्रत्यक्षात हजारो कामगारांच्या घामातून आणि संघर्षातून मिळालेला एक हक्क आहे. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही रविवारचा आनंद घ्याल, तेव्हा लोखंडे यांच्यासारख्या महान व्यक्तिमत्त्वाचे आभार मानायला विसरू नका.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 23, 2026 9:50 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
भारतात रविवारचीच बहुतेकांना सुट्टी का मिळते? काय आहे यामागचं कारण, इतिहास तुम्हाला आश्चर्यचकीत करेल









