Mumbai Taffic: मुंबईकर जरा दमानं, वाहतूक नियम मोडल्याने 25,618 वाहनांवर कारवाई
- Published by:Vrushali Kedar
- local18
Last Updated:
Mumbai Taffic: मुंबईतील ताडदेव, अंधेरी, वडाळा आणि बोरिवली आरटीओ कार्यालयांतील वायुवेग पथकांनी तपासणी मोहीम राबवल्या आहेत. या मोहिमांमध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई केली जात आहे.
मुंबई: राज्यासह राजधानी मुंबईमध्ये वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पर्यावरणावर याचा परिणाम होत असल्याचं दिसत आहे. मुंबईत वाहनांच्या वाढत्या संख्येबरोबरच वाहतूक नियमांच्या उल्लंघनाच्या घटनादेखील मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. मुंबईतील चारही परिवहन कार्यालयांनी मागील चार महिन्यांत केलेल्या कारवाईत 25 हजार 618 वाहनचालकांकडून सुमारे 12.23 कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबईतील ताडदेव, अंधेरी, वडाळा आणि बोरिवली आरटीओ कार्यालयांतील वायुवेग पथकांनी तपासणी मोहीम राबवल्या आहेत. या मोहिमांमध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई केली जात आहे. गेल्या चार महिन्यांत 84 हजारांहून अधिक वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 26 हजारांहून अधिक दोषी वाहनचालकांवर कारवाई झाली. त्यांच्याकडून आरटीओने 12.23 कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे.
advertisement
कारवाई होण्याची कारणे
मुंबईतील अनेक वाहनचालकांवर लायसन्स नसणे, विनाहेल्मेट गाडी चालवणे, सीटबेल्टचा वापर न करणे, वेगमर्यादेचं उल्लंघन करणे, अवैध प्रवासी वाहतूक करणे, प्रवासी वाहनातून मालवाहतूक करणे आणि क्षमतेपेक्षा अधिक वाहतूक करणमे इत्यादी कारणांमुळे कारवाई करण्यात आली आहे. ताडदेव आरटीओ कार्यालयाने 3.45 कोटी, अंधेरी कार्यालयाने 3.59, वडाळा कार्यालयाने 3.66 कोटी, बोरिवली कार्यालयाने 1.50 कोटी रुपयांचा दंड वसुल केला आहे.
advertisement
एका आरटीओ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, वाहनचालकांनी नियमांचं पालन करावं, यासाठी वायुवेग पथकाकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. कारवाईबरोबरच जनजागृती करण्यावरही भर दिला जात आहे. त्यामुळे अपघातांचे प्रमाण कमी होत आहे.
मुंबईकरांना आवरेना हॉर्नचा मोह
याशिवाय मुंबईकरांना हॉर्नचा मोह आवरत नसल्याचं चित्र दिसत आहे. कारण, विनाकारण हॉर्न वाजवल्याबद्दल 2024 मध्ये वाहतूक पोलिसांनी 21 हजार 492 चालकांवर कारवाई केली आहे. गेल्या वर्षभरात वाहतूक पोलिसांनी जोगेश्वरीमध्ये 2,558, समतानगरमध्ये 1940, नागपाड्यामध्ये 1,612, भायखळ्यामध्ये 1,590 आणि दादरमध्ये 837 चालकांवर कारवाई केली आहे. याशिवाय, बीकेसीमध्ये 205, मरीन ड्राइव्हमध्ये 108, विक्रोळीमध्ये 144, माटुंग्यामध्ये 148 आणि घाटकोपर-गोरेगावमध्ये 179 चालकांवर कारवाई झाली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 14, 2025 11:12 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Mumbai Taffic: मुंबईकर जरा दमानं, वाहतूक नियम मोडल्याने 25,618 वाहनांवर कारवाई