Raj Thackeray: 'जाहिरातबाजी ही महाराष्ट्राची संस्कृती नव्हती,आता...' राज ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना खरमरीत पत्र
- Published by:Sachin S
Last Updated:
सरकारने बांधावर जाऊन शेतकऱ्यांचे अश्रू पुसणे हे सरकारचं कामच आहे. पण त्याची जाहिरातबाजी ही महाराष्ट्राची संस्कृती नव्हती. त्यामुळे
मुंबई: राज्यभरात पावसाने धुमशान घातलं आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसामुळे शेती, घरं पाण्याखाली गेली आहे. सर्वच राजकीय पक्ष आणि नेते शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आले आहे. महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्र लिहिलं आहे. कोणत्याही निकषांवर अवलंबून न राहता शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर करा. ओला दुष्काळ जाहीर करून प्रति हेक्टरी ३० हजार रुपयांची मदत करा, अशी मागणी राज ठाकरेंनी केली आहे.
पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे हाल झाले आहे. लाखो हेक्टर जमीन पाण्याखाली गेली आहे. महायुती सरकारचे मंत्री शेताच्या बांधावर पोहोचले आहे. तर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना एक पत्र लिहिलं आहे.
सस्नेह जय महाराष्ट्र,
"महाराष्ट्रात अतिवृष्टीने जो धुमाकूळ घातला आहे, त्याबद्दल तुम्ही पूर्णपणे अवगत असालच. महाराष्ट्राचा असा कुठलाही भाग शिल्लक राहिलेला नसेल जिथे अतिवृष्टीने नुकसान केलं नसेल. आमच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी बोलल्यावर, लक्षात आलं आहे की, कित्येक ठिकाणी जमीन पूर्णपणे खरवडून वाहून गेलेली आहे. मे महिन्याच्या मध्यात जो पाऊस सुरु झाला आहे, त्याने जवळजवळ उघडीप घेतलीच नाहीये त्यामुळे, शेतीचं अतोनात नुकसान झालं आहे. ग्रामीण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था पूर्णपणे उध्वस्त झाली आहे.
advertisement
१) कुठल्याही निकषांच्या चौकटीत न लावता, सरसकट ओला दुष्काळ जाहीर करा. एकरी ७ आणि ८ हजार रुपये इतक्या तुटपुंजी नुकसान भरपाईने काहीही होणार नाही. त्याऐवजी एकरी किमान ३० हजार रुपये नुकसान भरपाई घोषित करा. कारण आता शेतकऱ्याची घडी बसायला किमान १ वर्ष लागेल.
२) गेल्या काही वर्षातल्या बेफाम उधळपट्टीने, राज्याची आर्थिक स्थिती नाजूक झालेली असली तरी, सरकारने हात आखडता घेऊ नये. वेळेस केंद्राकडे पाठपुरावा करावा आणि मदतीचं पॅकेज केंद्राकडून मिळवावं. केंद्र सरकारने बिहारला असं पॅकेज या आधी दिलं आहेच त्यामुळे महाराष्ट्राला द्यायला काही हरकत नसावी. आणि त्यासाठी दिल्लीचा जो काही पाठपुरावा करावा लागेल तो करावा. फक्त स्वतःच्या वैयक्तिक तक्रारींसाठी किंवा घटक पक्षातील संघर्षासाठी आम्ही दिल्लीत जातो असं चित्र न दिसता, सरकारमधले सगळे पक्ष राज्यासाठी पण दिल्लीत धाव घेतात हे पण राज्याला दिसू दे.
advertisement
३) अशा आपत्तीचा पहिला फटका बसतो तो मुला-मुलींच्या शिक्षणाला. एकाही मुलाचं शिक्षण बंद होणार नाही. त्याला लागणारी वह्या-पुस्तकं मिळतील आणि अशा परिस्थितीत सहामाही परीक्षा देताना मुलांच्या मनाची काय स्थिती असेल याचा सरकारने विचार करून काही कृती तात्काळ करावी. हिंदी भाषा लादताना दाखवलेली चपळाई आणि आग्रहीपणा इथे पण दिसेल अशी अपेक्षा.
advertisement
४) या अशा आपत्तीनंतर रोगराई प्रचंड वाढते त्यासाठी राज्याचा आरोग्य विभाग सतर्क राहील हे देखील सरकारने पहावं. जिल्हा रुग्णालयांपासून ते आरोग्य केंद्रांपर्यंत, सगळीकडे औषधांचा तुटवडा पडणार नाही हे सरकारने पहावं.
५) अशा संकटानंतर कर्जाच्या हप्त्यासाठी सुरु होणारा बँकांचा तगादा हा फारच तापदायक विषय असतो. एकतर बँकांना योग्य ती समज सरकारने आत्ताच द्यावी, अन्यथा आमचे महाराष्ट्र सैनिक ती देतीलच.
advertisement
सरकारने बांधावर जाऊन शेतकऱ्यांचे अश्रू पुसणे हे सरकारचं कामच आहे. पण त्याची जाहिरातबाजी ही महाराष्ट्राची संस्कृती नव्हती. त्यामुळे या सगळ्या मोहापासून दूर राहून सरकारने, प्रशासनाने आता एकरी किमान ३० ते ४० हजाराची मदत घोषित करावी आणि शेतकरी आणि त्याचं कुटुंब पुन्हा उभं राहील हे पहावं.
अशी मागणी राज ठाकरेंनी पत्रातून मुख्यमंत्री फडणवीस यांना केली आहे. राज्य सरकारच्या वतीने २ हजार कोटींची मदत जाहीर केली आहे. पण ही मदत कमी असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 24, 2025 8:05 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Raj Thackeray: 'जाहिरातबाजी ही महाराष्ट्राची संस्कृती नव्हती,आता...' राज ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना खरमरीत पत्र