भिगवण प्रकरणातील तरुणीला कसं पळवलं? नगरच्या दिशेनं गेलेली गाडी साताऱ्यात पोहोचली, 50 तास कुठे होतं कपल?
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
पुणे जिल्ह्याच्या इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील तरुणीच्या अपहरण प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसला आहे. आता या प्रकरणातील महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
सुमित सोनवणे, प्रतिनिधी दौंड: पुणे जिल्ह्याच्या इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील तरुणीच्या अपहरण प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसला आहे. मुलीच्या आई आणि भावाच्या डोळ्यात मिरची पूड टाकून आणि लाकडी दांडक्याने मारहाण करून तरुणीचं अपहरण केल्याचा आरोप करण्यात आला होता. आता या प्रकरणातील तरुण आणि तरुणी दोघेही समोर आले आहेत. रात्री उशिरा दोघं बारामती शहर पोलीस ठाण्यात हजर झाले. यावेळी तरुणीने अपहरणाचा दावा फेटाळला. आपण स्वमर्जीने तरुणासोबत गेली होती. आपलं त्याच्यावर प्रेम आहे, असं स्पष्टीकरण तरुणीने दिलं आहे.
याशिवाय, नेमकी ही घटना कशी घडली? ती प्रियकरासोबत कशी पळून गेली? कुटुंबीयांना कसा चकवा देण्यात आला? याची सगळी माहिती तरुणीने पोलिसांना दिली आहे. तिने एका प्रतिज्ञापत्रावर ही माहिती दिली.
तरुणीला कसं पळवलं?
पीडितेनं दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १७ फेब्रुवारीला दुपारी २ वाजून २० मिनिटांनी घडली. घटनेच्या दिवशी मुलीची आई आणि भाऊ तिला घेऊन भिगवण येथील बाजारपेठेमध्ये काही वस्तू खरेदी करण्यासाठी जाणार होते. याची माहिती स्वत: तरुणीने प्रियकराला दिली होती. तसेच तू भिगवण येथील रेस्ट हाऊसच्या जवळ आनंद हॉटेलच्या पाठीमागे येवून थांब. मी आई आणि भावाची नजर चुकवून तुझ्या सोबत निघून येणार आहे, असा फोन तिने तरुणाला केला होता.
advertisement
तरुणीने सांगितल्यानुसार, प्रियकर तरुण भिगवण येथील रेस्ट हाऊस जवळील आनंद हॉटेलच्या पाठीमागे एक टेम्पो गाडी घेऊन उभा होता. हे तिघेही मार्केटमध्ये आले असता तरुणीने आई आणि भावाची नजर चुकवून टेम्पोच्या दिशेनं पळ काढला आणि टॅम्पोत जाऊन बसली. यानंतर ती प्रियकराला घेऊन नगरच्या दिशेने गेले. पळून जात असताना तरुणीने आपल्या भावाला कॉल केला. पळून जात असल्याची माहितीही दिली.
advertisement
नगरच्या दिशेनं गेलेला टॅम्पो साताऱ्यात पोहोचला
तरुणीने पुढे सांगितलं की, आम्ही सुरुवातीला नगर दिशेने गेलो होतो. त्यानंतर नगरच्या बाहेरील बायपासने पुन्हा पुणे रोडने हडपसरला पोहोचलो. हडपसरवरून सासवड मार्गे सातारा जिल्ह्यातील वाठार बसस्टॉपला जाऊन थांबलो. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही दौंडच्या दिशेने येण्यासाठी निघालो. मात्र बातम्यांमध्ये माझं अपहरण झाल्याची तक्रार दाखल झाल्याची माहिती मिळाली. पण ही तक्रार खोटी आहे. ही तक्रार माझ्या आईने कोणाच्यातरी सांगण्यावरून किंवा कोणाच्यातरी दबावावरून दिलेली असून आईच्या फिर्यादीमधील मजकुराप्रमाणे कोणत्याही प्रकारची घटना घडलेली नाही. मी स्वतः माझ्या मर्जीने तरुणाबरोबर निघून आली आहे. मला या पुढील आयुष्य त्याच्यासोबतच काढायचं आहे. या प्रकरणात त्याला किंवा इतर कोणालाही दोषी ठरवण्यात येऊ नये, असंही तरुणीने सांगितलं.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Feb 20, 2026 9:36 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
भिगवण प्रकरणातील तरुणीला कसं पळवलं? नगरच्या दिशेनं गेलेली गाडी साताऱ्यात पोहोचली, 50 तास कुठे होतं कपल?










