गौरी गर्जे मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट, तीन महिन्यातच पतीला जामीन, काय आहे नेमकं कारण?
- Published by:Prachi Amale
Last Updated:
गौरी गर्जेने आत्महत्या केली नसून तिची हत्या करण्यात आली असल्याचा आरोप गौरीच्या पालकांनी केला होता.
संकेत वरक, प्रतिनिधी
मुंबई : भाजपच्या नेत्या आणि राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे याची पत्नी डॉ. गौरी पालवे यांनी वरळीच्या घरी गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं. पती अनंत गर्जेचे अन्य महिलेसोबतचे संबंध असल्याचे उघड झाल्याने अनंतसह त्याचे कुटुंबीय गौरीला त्रास देत असल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. त्याचबरोबर गौरीने आत्महत्या केली नसून तिची हत्या झाल्याचे आरोप देखील गौरी पालवेच्या माहेरच्या सदस्यांनी केला आहे. या प्रकरणी पोलिस सखोल तपास करत आहेत, तर गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणात अपडेट समोर येत आहे. गौरी गर्जे मृत्यू प्रकरणी पती अनंत गर्जेला जामीन मंजूर झाला आहे.
advertisement
डॉ. गौरी पालवे गर्जे आत्महत्या प्रकरणाने राज्यभर मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आज मुंबईत सत्र न्यायालयात कोर्टात सुनावणी पार पडली. या सुनावणीत अनंत गर्जेला जामीन मंजूर झाला आहे. तीन महिन्यातच अनंत गर्जेला जामीन मंजूर झाला आहे. 22 नोव्हेंबर 2025 रोजी गौरी गर्जे यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी पती अनंत गर्जे याला पोलिसांनी अटक करत चौकशी केली होती. गौरी गर्जेने आत्महत्या केली नसून तिची हत्या करण्यात आली असल्याचा आरोप गौरीच्या पालकांनी केला होता. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी खास SIT नेमण्यात आली होती.
advertisement
अनंत गर्जेने मारहाण करत असल्याचे केले होते मान्य
विशेष म्हणजे 6 फेब्रुवारीला झालेल्या सुनावणीत पोलिसांनी त्यांच्या युक्तिवादात आमच्याकडे काही अनंत यांच्या ऑडिओ क्लिप असल्याचे सांगितले. त्यात तो गौरीला मारहाण करत असल्याचे त्याने मान्य केल्याचे समोर आले आहे. या ऑडिओ क्लिप मध्ये अनंत यानेच एक रेकॉर्ड केलेली 20 मिनिटांची क्लिप आहे . त्यात तो गौरीला मारहाण करत असल्याचे त्याने मान्य केले असल्याचे पोलिसांनी सांगितले होते. तसेच गौरीला त्याच्या जुन्या प्रेम प्रकरणाबद्दल घरच्यांना काही सांगितलं तर आत्महत्या करेन असे दडपण टाकत होता हे स्पष्ट होत असल्याचे पोलिसांनी न्यायमूर्तींसमोर सांगितले होते.
advertisement
नेमकं काय आहे प्रकरण?
अनंत गर्जे आणि डॉ. गौरी पालवे यांचा विवाह फेब्रुवारी 2025 मध्ये झाला होता. दोघांचेही मूळ गाव एकच असून, नोकरीमुळे ते मुंबईत स्थायिक झाले होते. गौरी गर्जे या केईएम रुग्णालयातील दंत विभागात डॉक्टर म्हणून कार्यरत होत्या. नोकरीमध्ये उत्कृष्ट कामगिरी आणि स्वभावाने मनमिळावू असल्याचे त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितले आहे. परंतु, लग्नानंतर काही दिवसांतच कौटुंबिक मतभेद, तणाव आणि छळ वाढल्याचा आरोप गौरी यांच्या नातेवाईकांनी केला आहे. त्यांनी केवळ मानसिक त्रासच नव्हे तर शारीरिक हिंसाचार आणि पतीचे अनैतिक संबंध असल्याचेही गंभीर दावे पोलिसांसमोर केले आहेत. यामुळे प्रकरण अधिक संवेदनशील बनले असून, कौटुंबिक हिंसाचाराच्या बाजूनेही पोलिस तपास पुढे सरकला.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 23, 2026 5:59 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
गौरी गर्जे मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट, तीन महिन्यातच पतीला जामीन, काय आहे नेमकं कारण?








