धावपळ टळणार, कारभार गतिमान होणार, महाराष्ट्रात आता ई कॅबिनेट, मुख्यमंत्री फडणवीस यांचा मोठा निर्णय
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Maharashtra E Cabinet: एनआयसीने विकसित केलेल्या ई-कॅबिनेट ह्या प्रणालीचे सादरीकरण आज मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी मंत्रिमंडळ बैठकीत केले.
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य शासनाच्या कारभारात जास्तीत जास्त तंत्रज्ञानाचा वापर करून पारदर्शकता आणि गतीमानता आणण्यावर भर दिला असून त्याचाच एक भाग म्हणून ई-कॅबीनेटचा निर्णय घेतला आहे.
एनआयसीने विकसित केलेल्या ई-कॅबिनेट ह्या प्रणालीचे सादरीकरण आज मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी मंत्रिमंडळ बैठकीत केले. मंत्रिमंडळ बैठकीसाठी कागदांचा मोठ्या प्रमाणावर होणारा वापर कमी करण्यासाठी हे संपूर्ण आयसीटी (ICT) सोल्यूशन महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या प्रणालीमुळे मंत्र्यांसाठी अत्यंत सुलभ डॅशबोर्ड उपलब्ध होईल. त्याचबरोबर आवश्यक संदर्भ शोधणे, कृती बिंदू (ॲक्शन पॉइंट) पाहणे आणि घेतलेल्या निर्णयांच्या अंमलबजावणीबाबत पुनरावलोकन करणे सोपे होईल.
advertisement
बैठकांमध्ये येणाऱ्या विविध अडचणींवर तंत्रज्ञान प्रणालीमुळे मात करता येणार
ई-कॅबिनेटमुळे मंत्रिमंडळ बैठकांचे, निर्णयांचे व त्यासंबंधीच्या दस्तऐवजांचे जतन होईल. मंत्रिमंडळ निर्णय आणि त्यासंबंधीचे संदर्भ शोधणे सहज शक्य होईल.आतापर्यंत होत आलेल्या पारंपरिक मंत्रिमंडळ बैठकांमध्ये येणाऱ्या विविध अडचणींवर या प्रणालीमुळे मात करता येईल. मंत्रिमंडळासमोर सादर करण्यात येणारा प्रस्ताव ऑनलाईन अपलोड करणे, तो मंत्रिमंडळासमोर चर्चेसाठी आणि निर्णयासाठी सादर करणे, त्यावर अंतिम निर्णय व त्याबाबतच्या सर्व नोंदी ठेवणे ह्या सर्व प्रक्रिया सहजरित्या पार पडणार आहेत.
advertisement
सुशासनाच्या पूर्ततेतील एक महत्त्वाचा टप्पा
हा सुशासनाच्या पूर्ततेतील एक महत्त्वाचा टप्पा आहे. या प्रणालीमुळे मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी कागदपत्रांच्या वितरणासाठी शेवटच्या क्षणी होणारी धावपळ टळून या प्रक्रियेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांचा तसेच मंत्रिमंडळाचा मोठा वेळ वाचणार आहे.
संपूर्ण बैठक लगोलग फाईलींविना होणार नाही. कारण मंत्र्यांना सवय लागेपर्यंत मंत्रिमंडळ बैठकीत फाईल असतील. पण मंत्र्यांना जशीही ई फाईल्सची सवय लागेल, तसे आपण ई कॅबिनेटच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकून त्याची तंतोतंत अंमलबजावणीला सुरुवात करू, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 07, 2025 6:12 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
धावपळ टळणार, कारभार गतिमान होणार, महाराष्ट्रात आता ई कॅबिनेट, मुख्यमंत्री फडणवीस यांचा मोठा निर्णय








