धाराशिवमध्ये सरपंचावर झालेला हल्ला बनावट, पोलीस तपासात धक्कादायक सत्य समोर
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Crime in Dharashiv : धाराशिवमध्ये देखील एका सरपंचावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना समोर आली होती. पण आता या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे.
बालाजी निरफळ, प्रतिनिधी धाराशिव : बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणावरून महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण तापलं आहे. अनेक ठिकाणी आंदोलनं आणि निषेध मोर्चे काढले जात आहेत. सरकारला धारेवर धरलं जात आहे. ही घटना ताजी असताना धाराशिवमध्ये देखील एका सरपंचावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना समोर आली होती. पण आता या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं असून हा हल्ला बनावट असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.
बीडचं प्रकरण गाजत असताना धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूर तालुक्यातील मेसाई जवळगा गावाचे सरपंच नामदेव निकम यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची माहिती समोर आली होती. कदम यांची गाडी अडवून काही गुडांनी त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. गाडीवर पेट्रोल ओतून गाडी जाळण्याचा प्रयत्न केला, असा दावा निकम यांनी केला होता.
पण निकम यांनी बंदूक परवाना मिळवण्यासाठी हा कट रचला होता. आपल्या काही साथीदारांना हाताशी धरून त्यांनी स्वत:वर हल्ला झाल्याचा बनाव रचल्याचं उघड झालं आहे, पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी याबाबतचा खुलासा केला आहे. सरपंचावरील कथित हल्ल्याप्रकरणी चार अज्ञात आरोपींविरोधात तुळजापूर पोलिसात गुन्हा दाखल दाखल केला होता.
advertisement
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेसाई जवळगाचे सरपंच नामदेव निकम यांनी बंदूक परवाना मिळवण्यासाठी आपल्या काही साथीदारासोबत स्वतःवर हल्ल्याचा बनाव रचला होता. पवनचक्कीच्या वादातून हा हल्ला झाल्याचा आरोप त्यांनी केला होता. एवढंच नव्हे तर आरोपींना शिक्षा व्हावी, यासाठी सरपंच निकम यांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन देखील केलं होतं. पण त्यांचा हा सगळा स्टंट असल्याचं उघड झालं आहे. पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.
Location :
Osmanabad,Maharashtra
First Published :
January 02, 2025 3:33 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/धाराशिव/
धाराशिवमध्ये सरपंचावर झालेला हल्ला बनावट, पोलीस तपासात धक्कादायक सत्य समोर