कर्जमाफी कधी करणार ते सांगा... शेतकऱ्यांनी अजितदादांचं भाषण थांबवलं, नांदेडमध्ये राडा
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Ajit Pawar Nanded Daura: कर्जमाफी कधी करणार ते सांगा... अशा घोषणा देत शेतकऱ्यांनी अजित पवार यांना कोंडीत पकडले.
मुजीब शेख, प्रतिनिधी, नांदेड : नांदेड जिल्ह्यातील उमरी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा आणि पक्षप्रवेश सोहळा पार पडला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भाषणावेळी शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी घोषणा दिल्या. शेतकऱ्यांच्या घोषणाबाजीमुळे अजित पवार यांना काही वेळ भाषण थांबवावे लागले. सभास्थळी गोंधळ उडाल्यानंतर कर्जमाफी होणार नाही असे मी कधीच म्हटले नाही, अशी सारवासारव अजित पवार यांनी केली.
शिरीष देशमुख गोरठेकर आणि कैलास देशमुख गोरठेकर यांच्या नेतृत्वाखाली दीड हजार कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. या प्रवेशाला अजित पवार उपस्थित होते. यावेळी केलेल्या भाषणात त्यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले.
कर्जमाफी कधी करणार ते सांगा... अशा घोषणा देत शेतकऱ्यांनी अजित पवार यांना कोंडीत पकडले. त्यावर कर्जमाफी करणार नाही, असे मी म्हणालोच नाही... असे अजित पवार म्हणाले. मात्र शेतकरी घोषणा देत असल्याने पोलिसांनी तत्काळ कारवाई करीत दोन शेतकऱ्यांना ताब्यात घेतले.
advertisement
दादांचे भाषण, पावसाची हजेरी, भाषण आटोपते घ्यावे लागले
देगलूरच्या उमरी येथे आज सभा सुरू असताना अचानक पाऊस सुरू झाला. अजित पवार यांचे भाषण सुरू होण्यापूर्वी काही वेळ आधी पाऊस सुरू झाला. त्यामुळे लोकांची गैरसोय झाली, लोकांनी डोक्यावर खुर्च्या घेतल्या. त्यामुळे अजित पवार यांना आपले भाषण आटोपते घ्यावे लागले.
अजित पवार भाषणात काय म्हणाले?
advertisement
शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक पाणी, सुविधा आणि संसाधनं उपलब्ध करून देणं ही आपली सर्वोच्च प्राथमिकता आहे. अप्पर पैनगंगा कालव्याचं उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल, अशी खात्री दिली. त्याचबरोबर तरुण शेतकऱ्यांना आधुनिक आणि प्रगतशील शेतीचं प्रशिक्षण दिलं जाईल, जेणेकरून ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती आणि आत्मनिर्भरतेचा मार्ग मोकळा होईल. आज पक्ष प्रवेशाच्या निमित्तानं जुन्या कार्यकर्त्यांचा सन्मान राखला गेला आहे. नवीन कार्यकर्त्यांनाही तितक्याच सन्मानानं स्थान दिलं जाईल, वागवलं जाईल. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रत्येक कार्यकर्ता हा आपल्या कुटुंबाचा अविभाज्य भाग आहे, अशा भावना व्यक्त केल्या.
advertisement
कृषि मंत्री दत्ता भरणे यांच्या कार्यक्रमातही शेतकऱ्याचा गोंधळ
संपूर्ण कर्जमाफी करा, अतिवृष्टीचे अनुदान द्या, अशा मागण्या करून शेतकऱ्यांनी कृषि मंत्री दत्ता भरणे यांच्या कार्यक्रमात गोंधळ घातला. कृषिमंत्री दत्ता भरणे हे धाराशिव जिल्हा दौऱ्यावर होते. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी आढावा बैठक घेत असताना शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला. गोंधळ घालणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. अतिवृष्टीचे अनुदान दिवाळीपर्यंत देऊ असे आश्वासन सरकारने दिले होते. आश्वासनाची पूर्तता न झाल्याने शेतकरी आक्रमक झाले होते.
view commentsLocation :
Nanded,Maharashtra
First Published :
October 25, 2025 4:35 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
कर्जमाफी कधी करणार ते सांगा... शेतकऱ्यांनी अजितदादांचं भाषण थांबवलं, नांदेडमध्ये राडा


