डोक्यावर कर्जाचा डोंगर! सततची नापिकी, नियतीनेही हात टेकले, युवा शेतकऱ्यानं संपवलं जीवन
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Agriculture News : शेतीतील संकटे, सततची नापिकी, बाजारातील अस्थिर भाव आणि वाढत्या कर्जबाजारीपणाचा ताण यामुळे आणखी एका युवा शेतकऱ्याने जीवन संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला.
वृषभ फरकुंदे (प्रतिनिधी) नागपूर : शेतीतील संकटे, सततची नापिकी, बाजारातील अस्थिर भाव आणि वाढत्या कर्जबाजारीपणाचा ताण यामुळे आणखी एका युवा शेतकऱ्याने जीवन संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला. ही दुर्दैवी घटना नरखेड तालुक्यातील जलालखेडा गावात घडली असून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव गणेश नामदेव कळंबे (वय 30) असे आहे.
शेतीसाठी घेतलेले कर्ज ठरले जीवघेणे
गणेश कळंबे यांनी आपल्या दीड एकर शेतीच्या उत्पन्नासाठी भारतीय स्टेट बँकेकडून 73 हजार रुपयांचे शेती कर्ज घेतले होते. मात्र मागील काही वर्षांपासून पावसाच्या तुटवड्यामुळे आणि रोगराईमुळे पीक उत्पादनावर गंभीर परिणाम झाला होता. शेतमालाला बाजारात समाधानकारक दर न मिळाल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती ढासळत गेली.
कर्ज फेडण्याच्या चिंता, सततची नापिकी आणि घरखर्चाचा भार यामुळे गणेश मानसिक तणावात राहत होता. या ताणतणावाने शेवटी त्यांना आत्महत्येच्या उंबरठ्यावर आणले.
advertisement
रात्री अंगणात घेतला गळफास
शनिवारी उशिरा, सर्व कुटुंबीय झोपलेले असताना गणेश अंगणात गेला आणि बाहेरून दरवाजा बंद करून गळफास घेत आत्महत्या केली. रविवारी पहाटे त्यांच्या पत्नीला उठल्यावर गणेश घरात दिसला नाही. तिने घराबाहेर यायचा प्रयत्न केला, तेव्हा लक्षात आले की दरवाजा बाहेरून बंद आहे. खिडकीतून पाहिले असता गणेश गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला.
advertisement
तिने तात्काळ शेजारी राहणाऱ्या चुलत दीराला फोन करून घटनेची माहिती दिली. काही वेळातच घराचा दरवाजा उघडण्यात आला आणि आजूबाजूचे लोक धावून आले. पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला आणि मृतदेह प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आला, मात्र डॉक्टरांनी गणेशला मृत घोषित केले.
दरम्यान, गणेश कळंबे हे गावात मेहनती व शांत स्वभावाचे शेतकरी म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या मृत्यूनंतर गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Aug 03, 2025 10:45 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
डोक्यावर कर्जाचा डोंगर! सततची नापिकी, नियतीनेही हात टेकले, युवा शेतकऱ्यानं संपवलं जीवन









