BMC News: आधी नामांतर, मुंबईकरांचे प्रश्न वेटिंगवर! बीएमसीच्या पहिल्या बैठकीच्या अजेंड्यावरून नवा पेच, नेमकं प्रकरण काय?
- Written by:Shrikant Bhosale
Last Updated:
BMC: सार्वजनिक ठिकाणांच्या नामकरण-नामांतराचे तब्बल २७ पैकी २० प्रस्ताव अग्रक्रमावर असल्याने ‘विकासकामं नंतर, आधी नामांतर?’ असा सवाल उपस्थित होत आहे.
सुमित सावंत, प्रतिनिधी, मुंबई: चार वर्षांनंतर होणाऱ्या मुंबई महापालिकेच्या पहिल्या महासभेत शहरातील खड्डे, काँक्रिटीकरण, अतिक्रमणे, पाणीपुरवठा यांसारख्या मूलभूत प्रश्नांना प्राधान्य मिळेल, अशी मुंबईकरांची अपेक्षा आहे. मात्र, २५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या बैठकीच्या अजेंड्यावर रस्ते, पूल, चौक आणि सार्वजनिक ठिकाणांच्या नामकरण-नामांतराचे तब्बल २७ पैकी २० प्रस्ताव अग्रक्रमावर असल्याने ‘विकासकामं नंतर, आधी नामांतर?’ असा सवाल उपस्थित होत आहे.
सभेत उर्वरित प्रस्तावांमध्ये तीन प्रस्ताव विविध समित्यांवरील सदस्य नियुक्तीबाबत असून, एक प्रस्ताव पदपथावरील गटई कामगारांना स्टॉल देण्यासंदर्भात आहे. त्यामुळे पायाभूत सुविधांवरील ठोस निर्णयांपेक्षा नामांतराच्या राजकारणालाच अधिक महत्त्व दिले जात असल्याची चर्चा रंगली आहे.
>> प्रमुख नामांतर प्रस्ताव
वरळी जलतरण तलावाचे नाव ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जलतरण तलाव’ असे करण्याचा प्रस्ताव.
घाटकोपर-मानखुर्द रस्त्यावरील पुलाला ‘छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल’ हे नाव देण्याचा प्रस्ताव.
advertisement
काळा घोडा येथील चौकाचे नामांतर ‘सायमन पेरेस चौक’ असे करण्याचा प्रस्ताव.
अंधेरी (पश्चिम) येथील एका रस्त्यास ‘संगीतकार बप्पी लाहिरी मार्ग’ असे नाव देण्याचा प्रस्ताव
मालाड (पश्चिम) येथील जलतरण तलावाचे नामांतर ‘भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी जलतरण तलाव’ असे करण्याचा प्रस्ताव.
पवई जंक्शनला ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक’ असे नाव देण्याचा प्रस्ताव.
advertisement
याशिवाय लालबाग येथील बॉम्बे गॅस लेन मैदान, मुलुंडमधील झुलेलाल मंदिराजवळील चौक, चेंबूरमधील सांडू गार्डनजवळील रस्ता, परळ व कुर्ला येथील चौक अशा अनेक ठिकाणांच्या नामांतराचे प्रस्ताव सभागृहात मांडले जाणार आहेत.
>> ‘टिपू सुलतान’ प्रस्तावावरून राजकारण
पूर्वी शिवसेना-भाजप सत्ताकाळात एका रस्त्यास टिपू सुलतान यांचे नाव देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. त्या प्रस्तावाला भाजपकडून पाठिंबा मिळाल्याची आठवण करून देत विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना घेरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, २५ फेब्रुवारीच्या बैठकीत हा प्रस्ताव चर्चेसाठी नसल्याचे समजते.
advertisement
मूलभूत प्रश्नांवर दुय्यम प्राधान्य ?
शहरातील रस्त्यांची दुरवस्था, पावसाळ्यापूर्वीचे काँक्रिटीकरण, वाढती अतिक्रमणे, पाणीटंचाई यांसारखे प्रश्न ऐरणीवर असताना नामांतराच्या प्रस्तावांना अग्रक्रम देणे योग्य आहे का, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहे.
पालिकेच्या नव्या कार्यकाळातील पहिलीच बैठक ‘विकास’ की ‘नामांतर’ या मुद्द्यावर रंगणार, हे मात्र स्पष्ट झाले आहे. मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित प्रश्नांवर ठोस निर्णय होतात की राजकीय नामांतरावरच चर्चा रंगते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 22, 2026 11:39 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
BMC News: आधी नामांतर, मुंबईकरांचे प्रश्न वेटिंगवर! बीएमसीच्या पहिल्या बैठकीच्या अजेंड्यावरून नवा पेच, नेमकं प्रकरण काय?









