जखमी मित्राचा रक्ताअभावी मृत्यू, दशक्रिया विधीला रक्तानेच श्रद्धांजली, मित्रांनी काय केलं?
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Nashik News: मयूरचा दशक्रिया विधी करण्याऐवजी अशा घटना घडून नयेत म्हणून समाजासाठी काहीतरी करण्याचा निर्णय घेतला.
नाशिक: अपघातात जखमी झालेल्या मित्राचा रक्ताअभावी जीव गेला. ही वेळ दुसऱ्या कुणावर येऊ नये, म्हणून त्याच्या मित्रांनी मोठा निर्णय घेतला. मयूर द्वारकानाथ कातकाडे याच्या दशक्रिया विधीच्या दिवशीच 45 जणांनी रक्तदान केले. सिन्नर तालुक्यातील केपानगर येथील या घटनेतून समाजासमोर एक आगळावेगळा आदर्श निर्माण केला आहे.
मयूर कातकाडे याचा 27 मार्च रोजी रात्रीच्या सुमारास केपानगर येथील कृष्ण मंदिराजवळ भीषण अपघात झाला. यामध्ये त्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यामुळे रक्तस्राव झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वेळेवर रक्त उपलब्ध न झाल्याने मयूरची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. मयूरचा मृत्यू रक्ताअभावी झाल्याचे शल्य कुटुंबीय आणि मित्र परिवाराला देखील बोचत होतं. त्यामुळे त्यांनी समाजापुढे आदर्श निर्माण करणारा निर्णय घेतला.
advertisement
मयूरचा दशक्रिया विधी करण्याऐवजी अशा घटना घडून नयेत म्हणून समाजासाठी काहीतरी करण्याचा निर्णय झाला. त्यानुसार रक्ताअभावी कुणाचे प्राण जाऊ नयेत म्हणून दशक्रिया विधीच्या दिवशीच रक्तदान शिबीर घेण्याचे निश्चित केले.
रक्तदानामुळे प्राण वाचणार
मयूरच्या दशक्रिया विधीच्या दिवशी मित्रपरिवारातर्फे आयोजित रक्तदान शिबिरासाठी जनकल्याण रक्तपेढी नाशिक यांनी सहकार्य केले. दिवसभरात 45 बॅग रक्त संकलित करण्यात आले. मयूरच्या अकाली जाण्याने त्याची पोकळी कधीच भरून निघणार नाही. मात्र, या रक्तदानामुळे अनेकांचे प्राण वाचतील, असं मित्र आणि कुटुंबीयांचं म्हणणं आहे.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
Apr 07, 2026 10:52 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
जखमी मित्राचा रक्ताअभावी मृत्यू, दशक्रिया विधीला रक्तानेच श्रद्धांजली, मित्रांनी काय केलं?










