Parbhani accident: हळद लावली अन् लग्नाला येतो सांगून निघाला, रात्री 11 वाजता भावासोबत घडलं भयंकर
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
परभणीतील लग्नसमारंभात आलेला अमोल वाटोडे अज्ञात वाहनाच्या धडकेत ठार, जिंतूर औंढा महामार्गावरही कार दुचाकी अपघातात वसमतच्या दोघांचा मृत्यू
Parbhani accident: लग्नासाठी मांडव सजला, करवल्या तयार झाल्या आणि हळदीचा रंग नवरदेवाच्या अंगावर चढला. हळद लावायला आलेल्या भावाच्याही अंगाला नवरदेवानं थोडी हळद लावली. हळदीचा समारंभ करून घरी परतत असताना मात्र भावावर काळानं घाला घातला. लग्नाच्या आनंदावर विरजण पडलं, घात झाला आणि संपूर्ण कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.मावसभावाच्या लग्नासाठी परभणीत आलेल्या ३० वर्षीय अमोल वाटोडे या तरुणाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला.
एका अज्ञात वाहनचालकाच्या निष्काळजीपणामुळे एका हसतखेळत्या तरुणाचा जीव गेल्याने वाटोडे कुटुंबासह संपूर्ण वाडी दमई गावावर शोककळा पसरली. वाडी दमई येथील रहिवासी असलेला अमोल सुधाकर वाटोडे ४ एप्रिल रोजी परभणीत आपल्या मावसभावाच्या हळदीच्या कार्यक्रमासाठी मोठ्या आनंदाने आला होता. लग्नाची खरेदी, भावाचं कौतुक आणि नातेवाईकांच्या भेटीगाठी यात तो रमला होता.
रात्री अकराच्या सुमारास भीषण अपघात
रात्री ११च्या सुमारास कारेगाव रोडवरील नवीन डी-मार्ट इमारतीसमोरून तो पायी जात होता. याच वेळी काळाने घाला घातला. भरधाव येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने अमोलला जोरदार धडक दिली. अपघाताची माहिती मिळताच नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. अमोलच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्याला तातडीने परभणीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. एकीकडे घरी लग्नाची लगबग सुरू होती, तर दुसरीकडे अमोल मृत्यूशी झुंज देत होता. मात्र, नियतीला काही वेगळेच मान्य होते. उपचारादरम्यान अमोलची ही झुंज अपयशी ठरली आणि त्याने जगाचा निरोप घेतला.
advertisement
लग्नघरातला आनंद क्षणात दु:खात बदलला
भरलेल्या घरात अचानक शांतता पसरली. ज्या हातांनी भावाला हळद लावली होती, त्याच हातांवर आता अंत्यविधीची वेळ आली. अवघ्या ३० वर्षांच्या अमोलच्या जाण्याने वाटोडे कुटुंबाचा आधार हरपला. भावावर काळाने घाला घातल्यामुळे नवरदेवही पुरता कोलमडून गेला. कुटुंबियांचा मोठा आधार हरपला. वडील सुधाकर वाटोडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नवा मोंढा पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
advertisement
जिंतूर औंढा महामार्गावरही भीषण अपघात
ओव्हरटेक करण्याच्या नादात रविवारी दुपारी जिंतूर आणि औंढा नागनाथ महामार्गावर भीषण अपघात झाला. कार चालक दुचाकीला ओव्हरटेक करून पुढे आला मात्र समोरून येणाऱ्या दुचाकीला त्याने जोरदार धडक दिली. दुचाकीवरील तरुण 20 फूट लांब फेकला गेला. या भीषण अपघातात वसमत शहरातील दोघांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. अपघात इतका भीषण होता की, दुचाकी आणि कार या दोन्ही वाहनांच्या पुढील भागाचा पूर्ण चक्काचूर झाला.
Location :
Maharashtra
First Published :
Apr 06, 2026 9:05 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Parbhani accident: हळद लावली अन् लग्नाला येतो सांगून निघाला, रात्री 11 वाजता भावासोबत घडलं भयंकर








