अपत्य भावाचं नाही, वहिनी प्रियकरासोबत पळून जाताच दीराकडून पुतणीची खांडोळी, महाराष्ट्राला हादरवणारी घटना!
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
कौटुंबिक रागातून आणि बदनामीच्या भावनेतून माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील गवळेवाडी येथे उघडकीस आली आहे.
तुळजापूर: कौटुंबिक रागातून आणि बदनामीच्या भावनेतून माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील गवळेवाडी येथे उघडकीस आली आहे. भावजय प्रियकरासोबत पळून गेल्याच्या रागातून एका माथेफिरू दिराने आपल्या अवघ्या १३ महिन्यांच्या निष्पाप पुतणीची गळा घोटून जीव घेतला. आरोपी इतक्यावरच थांबला नाही, तर त्याने चिमुकलीच्या शरीराचे सात तुकडे करून नाल्यात पुरले. गावातील एका व्यक्तीने हा प्रकार पाहिल्यानंतर ही माणुसकीला हादरवणारी घटना उघडकीस आली.
नेमकी घटना काय?
गवळेवाडी येथील २२ वर्षीय विवाहिता २२ फेब्रुवारी रोजी आपल्या प्रियकरासोबत पळून गेली होती. याप्रकरणी पतीच्या तक्रारीवरून तामलवाडी पोलीस ठाण्यात मिसिंगची नोंद करण्यात आली होती. पोलीस या महिलेचा शोध घेत असतानाच, २७ फेब्रुवारीच्या पहाटे या महिलेची १३ महिन्यांची मुलगी अचानक घरातून गायब झाली. आई पळून गेलेली असतानाच आता मुलगीही बेपत्ता झाल्याने परिसरात खळबळ माजली होती.
advertisement
तपासादरम्यान पोलिसांनी पळून गेलेल्या महिलेला २७ फेब्रुवारी रोजी तुळजापूर तालुक्यातील बावी येथून ताब्यात घेतले. मात्र, तिने मुलगी आपल्याकडे नसल्याचं सांगितलं. त्यामुळे पोलिसांचा संशय मुलीचा काका शंकरेश्वर माने याच्यावर बळावला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. मात्र तो उडवाउडवीची उत्तरं देत असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. यामुळे पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
advertisement
आरोपी शंकरेश्वरने सांगितले की, भावजय पळून गेल्यामुळे गावात कुटुंबाची मोठी बदनामी झाली होती. याच रागातून त्याने २७ तारखेच्या पहाटे झोपलेल्या चिमुकलीला उचलून शेतात नेले. तिथे तिचा गळा आवळून खून केला आणि पुरावा नष्ट करण्यासाठी कोयत्याने तिच्या शरीराचे सात तुकडे करून पोत्यात भरले. हे पोते त्याने शेतातील एका नाल्यात पुरून टाकले.
advertisement
प्रत्यक्षदर्शीमुळे फुटले भांडे
आरोपीने अत्यंत सावधगिरीने हा गुन्हा केला होता. मुलगी बेपत्ता झाल्यावर सर्वांचा संशय पळून गेलेल्या आईवरच जाईल, असा त्याचा कयास होता. मात्र, पहाटेच्या सुमारास तो मुलीला घेऊन जात असताना गावातील एका व्यक्तीने त्याला पाहिले होते. त्या व्यक्तीने पोलिसांना दिलेल्या माहितीमुळे या भीषण हत्याकांडाचा उलगडा झाला. संबंधित मुलगी आपल्या भावाची नाही, असा संशय आरोपीला होता, याच कारणातून त्याने मुलीला संपवल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
Location :
Osmanabad,Maharashtra
First Published :
Mar 02, 2026 7:49 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अपत्य भावाचं नाही, वहिनी प्रियकरासोबत पळून जाताच दीराकडून पुतणीची खांडोळी, महाराष्ट्राला हादरवणारी घटना!








