बायकोशी भांडणं, पुण्याहून पोरींना घेऊन वाशिमला निघाला, रस्त्यातच जुळ्या मुलींचे गळे चिरले, जंगलात पुरले, पोलीस स्टेशनमध्ये जाऊन कबुली
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
बापाने केवळ पत्नी सोबत झालेल्या भांडणाचा राग मनात ठेवून आपल्या दोन निष्पाप मुलींना मारल्याने समाज मन सुन्न झाले आहे.
किशोर गोमाशे, प्रतिनिधी, वाशिम : वाशिमच्या रुई गोस्ता येथील राहुल चव्हाण या निष्ठुर व्यक्तीने कसायालाही लाजवेल असे कृत्य केले आहे. त्याने आपल्या तीन वर्षीय दोन जुळ्या मुलींचा गळा चिरून खून करत त्यांची प्रेतं जंगलात फेकल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली असून आपल्या मुलींना मारून टाकल्याचा पश्चाताप झाल्याचे सांगून तो आसेगांव पोलिस स्टेशनमध्ये पोलिसांच्या स्वाधीन झाला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. बापाने केवळ पत्नी सोबत झालेल्या भांडणाचा राग मनात ठेवून आपल्या दोन निष्पाप मुलींना मारल्याने समाज मन सुन्न झाले आहे.
पुण्याहून पोरींना घेऊन वाशिमला निघाला, रस्त्यातच मुलींचे गळे चिरले
वाशिमच्या रुई गोस्ता येथील राहुल चव्हाण हा मागील चार ते पाच वर्षापासून पुण्यात एका कंपनीत नोकरी करत होता. त्याचे वाशिम जिल्ह्यातील शेगी येथील एका मुलीसोबत लग्न झाले होते. तेव्हापासून राहुल चव्हाण आणि त्याची पत्नी हे पुण्यातच वास्तव्य करून होते. राहुल चव्हाण आणि त्याच्या पत्नीचे 18 ऑक्टोबर रोजी भांडण झाल्याचे तो सांगत आहे. त्यानंतर राहुलची पत्नी पुण्यातच वास्तव्यास असलेल्या तिच्या आई वडिलांकडे निघून गेली.
advertisement
त्यानंतर राहुल चव्हाण हा आपल्या 3 वर्षीय प्रणाली आणि प्रतीक्षा या दोन जुळ्या मुलींना मोटार सायकलवर घेऊन आपल्या गावी रुई गोस्ता इथे येण्यासाठी निघाला. त्याच्या डोक्यात पत्नी सोबत भांडण होऊन ती माहेरी गेल्याचा राग असल्याने गावी येत असताना ऐन दिवाळीच्या दिवशी 21 ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजताच्या दरम्यान त्याने देऊळगांव राजा ते चिखली दरम्यानच्या अनचरवाडी परिसरातील जंगलात प्रणाली आणि प्रतीक्षा या दोन जुळ्या मुलींचे गळे चिरून त्यांची हत्या केली आणि त्यांचे मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकून देत तो गावी निघून आला.
advertisement
पोलीस स्टेशनमध्ये जाऊन निर्दयी कृत्याची कबुली
त्याला त्या घटनेचा पश्चाताप झाल्यानंतर तो स्वतः हून वाशिमच्या आसेगांव पोलिसांच्या स्वाधीन झाला. त्या नंतर ही खळबळजनक घटना उघडकीस आली. राहुल चव्हाणने दोन मुलींची हत्या केल्याची कबुली दिल्यानंतर आसेगांव पोलिसांनी त्याला घटनास्थळ विचारले असता त्याला ते नीट आठवत नव्हते. त्यामुळे आसेगांव पोलिसांचं एक पथक त्याला घेऊन घटना स्थळी गेले. त्यानंतर अंढेरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत हे दुहेरी हत्याकांड घडल्याने सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
advertisement
त्या परिसरात शोध घेतला असता त्या दोन्ही चिमुकल्या जुळ्या बहिणींचे कुजलेले मृतदेह आढळून आले. ही हत्येची घटना अनेकांना अंतर्मुख करायला लावणारी आहे. ज्या बापाने आपल्या अंगाखांद्यावर मुलींना खेळवले, त्यांचे लाड पुरवले, त्याच बापाने केवळ रागाचे खूळ डोक्यात ठेवून आपल्या दोन चिमुकल्या मुलींचा एका झटक्यात जीव घेतला, यावर कुणाचा ही विश्वास बसणार नाही. मात्र ही सत्य घटना असल्याने अनेकांना धक्का बसला आहे. आपल्या जुळ्या मुलींची हत्या करणाऱ्या या निर्दयी बापाबद्दल समाजात संताप दिसत आहे. या दुहेरी हत्येचा तपास आसेगांव आणि अंढेरा पोलीस करत आहेत. केवळ पती पत्नीच्या भांडणाचे पर्यवसान दोन मुलींच्या हत्येत झाल्याने राहुल चव्हाण याचे पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे.
view commentsLocation :
Washim,Maharashtra
First Published :
October 25, 2025 10:02 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
बायकोशी भांडणं, पुण्याहून पोरींना घेऊन वाशिमला निघाला, रस्त्यातच जुळ्या मुलींचे गळे चिरले, जंगलात पुरले, पोलीस स्टेशनमध्ये जाऊन कबुली


