तुम्हाला न विचारताच जमिनीची विक्री झाली असेल तर काय करायचं? विक्री पत्र अपात्र कसं ठरवायचं?
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Jamin Kharedi Vikri : सहहिस्सेदार किंवा मालकांची संमती न घेता सामायिक जमिनीची विक्री करणे हा महाराष्ट्रात गंभीर फौजदारी गुन्हा मानला जातो.
मुंबई : सहहिस्सेदार किंवा मालकांची संमती न घेता सामायिक जमिनीची विक्री करणे हा महाराष्ट्रात गंभीर फौजदारी गुन्हा मानला जातो. अशा प्रकारची विक्री कायद्याने बेकायदेशीर असून, फसवणूक झाल्यास संबंधित व्यक्तींविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करता येतो. त्यामुळे जमीन खरेदी करताना सातबारा उतारा आणि सर्व कागदपत्रांची सखोल पडताळणी करणे अत्यंत आवश्यक
असते.
संमतीशिवाय विक्री बेकायदेशीर
सामायिक (जॉइंट) जमिनीमध्ये प्रत्येक सहहिस्सेदाराचा ठरावीक हिस्सा असतो. त्यामुळे अशा जमिनीची विक्री करताना सर्व मालकांची स्पष्ट संमती घेणे बंधनकारक आहे. एखाद्या व्यक्तीने इतरांच्या परवानगीशिवाय संपूर्ण जमीन विकल्यास ती व्यवहार कायद्याने ग्राह्य धरली जात नाही.
बनावट कागदपत्रे वापरणे गुन्हा
अनेक प्रकरणांमध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन विक्री केल्याचे समोर येते. अशा प्रकारांमध्ये संबंधितांवर फसवणूक तसेच कागदपत्रांमध्ये फेरफार केल्याचे गुन्हे दाखल होऊ शकतात. यात केवळ विक्रेता नव्हे, तर व्यवहारात सहभागी असलेले दलाल, संबंधित अधिकारी आणि काही वेळा खरेदीदारांवरही कारवाई होऊ शकते.
advertisement
कठोर कायदेशीर कारवाईची तरतूद
संमतीशिवाय विक्रीच्या प्रकरणांमध्ये प्रशासनाकडून कठोर कारवाई केली जाते. संबंधित तलाठी, दलाल आणि इतर संबंधितांवर गुन्हे दाखल होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा व्यवहारांपासून दूर राहणे आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत गरजेचे आहे.
फसवणूक झाल्यास काय करावे?
जर तुमच्या जमिनीची परस्पर विक्री झाल्याचे आढळले, तर त्वरित पोलीस ठाण्यात तक्रार (FIR) दाखल करणे आवश्यक आहे. त्यासोबतच दिवाणी न्यायालयात विक्रीपत्र रद्द करण्यासाठी दावा दाखल करावा. वकिलामार्फत "विक्री करार रद्द करणे" (Cancellation of Sale Deed) आणि मालकी हक्क प्रस्थापित करण्यासाठी स्वतंत्र दावा करता येतो.
advertisement
ताबा कायम ठेवणे महत्त्वाचे
जमिनीचा ताबा तुमच्याकडे असल्यास तो कायम ठेवणे महत्त्वाचे आहे. चुकीच्या पद्धतीने विक्री झाल्यास नवीन खरेदीदाराला ताबा देऊ नये. तसेच, ७/१२ उताऱ्यावर नाव बदल होऊ नये यासाठी तहसीलदार किंवा नोंदणी अधिकाऱ्यांकडे तक्रार करून आवश्यक कारवाई करावी.
जमीन खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी
जमीन खरेदीपूर्वी सातबारा उताऱ्यावर नोंद असलेली नावे तपासणे आवश्यक आहे. तसेच फेरफार नोंदी (Mutation Entries) पाहणे आणि प्रत्यक्ष जागेचा ताबा कोणाकडे आहे, याची खात्री करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. योग्य पडताळणी केल्यास भविष्यातील कायदेशीर अडचणी टाळता येऊ शकतात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 30, 2026 11:48 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
तुम्हाला न विचारताच जमिनीची विक्री झाली असेल तर काय करायचं? विक्री पत्र अपात्र कसं ठरवायचं?








