उन्हाच्या तडाख्यात टरबूज शेतीचा आधार, एकरात घेतले दोन लाखांचे उत्पन्न, Video
- Published by:News18 Marathi
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
उसाच्या शेतात आंतरपीक म्हणून केलेल्या टरबूज शेतीतून शेतकऱ्याला चांगले उत्पन्न मिळाले आहे.
नारायण काळे, प्रतिनिधी
जालना : सततचा दुष्काळ, अवकाळी पावसाचे संकट तसेच शेतीमालाला योग्य भाव न मिळणं, अशा विविध अडचणींचा सामना शेतकरी वर्ग सातत्याने करत असतो. अनेक आव्हानांचा सामना करत शेतकरी आपल्या शेतात नवनवे प्रयोग करत असतो. असाच एक प्रयोग जालना जिल्ह्यातील वडीगोद्रीचे शेतकरी अशोक आटोळे यांनी केला आहे. आपल्या तीन एकर शेतामध्ये ऊस शेती केली असून त्यात आंतरपीक म्हणून टरबूज लागवड केली. यातील एका एकरातून आतापर्यंत दोन लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. तर 3 एकरात 5 लाखांचा नफा अपेक्षित आहे, असे शेतकरी आटोळे सांगतात.
advertisement
कसं केलं नियोजन?
अंबड तालुक्यातील वडिगोद्री जवळील पिठोरी सिरसगाव येथील अशोक आटोळे यांनी टरबूज शेती केली. आपल्या एक एकरात 5 बाय 1.25 फूट अंतरावर बियाणे वापरले. मल्चिंग, ठिबकद्वारे पाण्याचे नियोजन करून टरबूज लागवड केली. दोन किलोपासून सहा किलोपर्यंत वजनाचे टरबूज आले. त्यामुळे विक्रमी 25 टन टरबुजाचे उत्पादन मिळाले, असे आटोळे यांनी सांगितले.
advertisement
एका एकरात 1 लाख 60 हजारांचा नफा
टरबूज शेतीतून 14 टनाला 9.50 रुपये प्रतिकिलोप्रमाणे 1 लाख 25 हजार रुपये एवढे उत्पन्न मिळाले. तर 10 टनाला 7 रुपये किलोप्रमाणे 70 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. एकूण 1 लाख 95 हजार रुपये या शेतीतून मिळाले. यामध्ये 35 हजार रुपये खर्च सोडता निव्वळ एक लाख साठ हजारांचा नफा त्यांना झाला आहे. तर एकूण तीन एकर क्षेत्रावर साडेचार ते पाच लाख रुपयांचे उत्पन्न होईल, अशी अपेक्षा आटोळे यांना आहे.
advertisement
दरवर्षी शेतात टरबूज लागवड
पारंपरिक पिके घेऊनही उत्पन्नाची शाश्वती नाही. त्यात अवकाळीचा फटका बसल्यानंतर मेहनत वाया जाते. उत्पन्नही कमी होते. यामुळे दरवर्षी शेतात टरबूज लागवड करतो. यातून चांगले उत्पन्न मिळत आहे. शेतीत प्रयोग करताना व्यवस्थापन योग्य पद्धतीने करणे गरजेचे आहे, असे शेतकरी अशोक आटोळे यांनी सांगितले.
advertisement
आधुनिक शेतीकडे वळावे
टरबूज शेतीसाठी आधुनिक पद्धत, खते, तणनाशक, कीटकनाशकांचा योग्य प्रमाणात वापर केला. तसेच शास्त्रशुद्ध पद्धतीने केलेले व्यवस्थापन यामुळे विक्रमी उत्पादन घेण्यात यश आल्याचे आटोळे यांनी स्पष्ट केले. आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी देखील पारंपारिक पिकांना फाटा देऊन शेतीमध्ये नवनवीन पिके घ्यावीत. त्याचे योग्य व्यवस्थापन करावे व चांगला आर्थिक फायदा मिळवावा, असे आवाहन आटोळे यांनी केले.
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
April 02, 2024 3:05 PM IST