Mumbai Local: मुंबई आणि परिसरात दिवसाला 6 रेल्वे प्रवाशांचा मृत्यू, अपघाताची धक्कादायक आकडेवारी
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
मुंबई लोकलमधील दररोजच्या धोकादायक प्रवासाची तीव्र जाणीव करून देणारी आहे. 2025 सालची आकडेवारी पाहिली तर परिस्थिती किती गंभीर आहे, हे स्पष्ट होते.
प्रतिनिधी- संकेत वरक, मुंबई: ठाणे जिल्ह्यातील डोंबिवलीतील 18 वर्षांचा विद्यार्थी सोहम कटारे 12 वीच्या बोर्ड परीक्षेला जाण्यासाठी सकाळच्या गर्दीच्या वेळी लोकलने निघाला मात्र तो परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचलाच नाही. कळवा-मुंब्रा दरम्यान अतिगर्दीच्या CSMT लोकलमधून तोल जाऊन तो खाली पडला आणि गंभीर जखमी अवस्थेत आढळला. रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पहिल्याच पेपरच्या दिवशी घडलेल्या या घटनेने संपूर्ण राज्य हादरले. मात्र ही केवळ एक घटना नसून, मुंबई लोकलमधील दररोजच्या धोकादायक प्रवासाची तीव्र जाणीव करून देणारी आहे. 2025 सालची आकडेवारी पाहिली तर परिस्थिती किती गंभीर आहे, हे स्पष्ट होते.
दिवसाला सरासरी 06 लोकांचा रेल्वे अपघातात मृत्यू
मुंबईतील लोकल व मुख्य रेल्वे नेटवर्कमधील अपघातांचे 2025 सालीचे आकडे सार्वजनिक झाले आहेत. 1 जानेवारी 2025 ते 31 डिसेंबर 2025 दरम्यान मध्य रेल्वे (CR) मध्ये 1457 प्रवाशांचा मृत्यू तर पश्चिम रेल्वे (WR) मध्ये 830 प्रवासी मृत्युमुखी पडले. जखमी होणाऱ्यांची संख्या देखील मोठी असून मध्य रेल्वेत 1565, तर पश्चिम रेल्वेत 989 प्रवासी जखमी झाले आहेत. त्यामुळे सरासरी काढली तर दिवसाला 06 लोकांचा रेल्वे अपघातात मृत्यू होतो तर जवळपास 10 ते 12 लोकांचा रोज अपघात होतो.
advertisement
स्टेशननिहाय पाहता, मध्य रेल्वेत सर्वाधिक मृत्यू ठाणे (278), कल्याण (266), कुर्ला (206) आणि डोंबिवली (111) येथे नोंदवला गेला. पश्चिम रेल्वेत बोरीवली (244), वसई (170), पालघर (120) आणि मुंबई सेंट्रल (117) या स्थानकांवर आकडेवारी अधिक आहे. जखमी होण्याच्या बाबतीतही हीच परिस्थिती आहे; कल्याण, दादर, CSMT, ठाणे आणि कुर्ला हे स्टेशन अग्रस्थानी आहेत.
advertisement
सर्वाधिक अपघाताचे कारण
अपघाताचे प्रकार पाहता, लाईन क्रॉसिंग आणि ट्रेनमधून पडणे ही सर्वात प्रमुख कारणे आहेत. मध्य रेल्वेत 658 मृत्यू आणि पश्चिम रेल्वेत 405 मृत्यू हे लाईन क्रॉसिंगमुळे म्हणजेच रेल्वेचे रूळ ओलांडताना झाले. ट्रेनमधून पडल्यामुळे मध्य रेल्वेत 378 आणि पश्चिम रेल्वेत 147 प्रवासी मरण पावले. याशिवाय रेल्वे पोलाला धडकणे, प्लॅटफॉर्म-ट्रेन गॅपमध्ये अडकणे आणि विजेचा झटका हे काही अपघाताचे इतर कारणे आहेत. जखमी होण्याच्या बाबतीतही हीच ट्रेंड पाहायला मिळतो.
advertisement
या आकडेवारीतून स्पष्ट होते की, मुंबईतील रेल्वे आणि लोकल प्रवास अजूनही प्रवाशांसाठी धोका निर्माण करत आहेत. बोरीवली, ठाणे, कल्याण, कुर्ला आणि CSMT सारखी ठिकाणे ही संवेदनशी क्षेत्र आहेत. ही आकडेवारी रेल्वे प्रशासनासाठी चेतावणी आहे की प्रवाशांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 11, 2026 6:27 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Local: मुंबई आणि परिसरात दिवसाला 6 रेल्वे प्रवाशांचा मृत्यू, अपघाताची धक्कादायक आकडेवारी








