एप्रिलच्या सुरुवातीलाच उष्णतेची लाट, राज्यात पारा 42 पार जाण्याची शक्यता, Video
- Reported by:Mayuri Sarjerao
- Published by:News18 Marathi
Last Updated:
राज्यात दिवसेंदिवस तापमानात मोठी वाढ होत असून काही ठिकाणी तापमान 41 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे.
मयुरी सर्जेराव, प्रतिनिधी
मुंबई: महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा कडाका चांगलाच वाढला आहे. तापमानाने चाळीशी पार केलीय. आता सुरू झालेल्या एप्रिल महिन्यातही वातावरणातील उष्णतेची तीव्रता आणखी वाढणार आहे. बहुतांश ठिकाणी पारा 42 पार जाण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 3 एप्रिल रोजी विदर्भ आणि मराठवाड्यात तापमानात पुन्हा वाढ होणार आहे. तर सोलापूर, नांदेड, उस्मानाबाद आणि लातूरमध्ये उष्णतेचा यलो अलर्ट जारी करण्यात आलाय.
advertisement
मुंबईत उकाडा वाढला
राजधानी मुंबईत तापमान 33 अंशांवर गेलंय. उष्णता आणि उकाड्याने मुंबईकर हैराण झाले आहेत. एप्रिलच्या सुरुवातीलाच मुंबईत पुन्हा उन्हाची तीव्रता वाढणार आहे. 3 एप्रिल रोजी मुंबईचे तापमान 33 अंश सेल्सिअस राहणार आहे. तर किमान तापमान 26 अंशांवर राहील असा, अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
advertisement
पुण्यात पारा 40 अंशांवर
पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख शहर असणाऱ्या पुण्यात पारा चाळीशी पार गेलाय. येत्या दोन आठवड्यात यात आणखी दोन अंशांची भर पडण्याची शक्यता आहे. 3 एप्रिल रोजी पुण्यात तापमान 40 अंशांपर्यंत राहील. तर कमाल तापमान 19 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. तसेच पुणे आणि परिसरातील वातावरण ढगाळ राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. दुसरीकडे कोल्हापूरमध्ये दोन दिवसांपासून कमाल आणि किमान तापमानात कोणताही बदल दिसून आलेला नाही. 3 एप्रिल रोजी देखील कमाल तापमान 39 तर किमान तापमान हे 23 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे.
advertisement
नाशिकमध्ये उष्णतेची लाट
उत्तर महाराष्ट्रातही उष्णतेची लाट आहे. नाशिकमध्ये तापमान 40 अंशांच्या पार गेलंय. 3 एप्रिल रोजीही तापमानाची स्थिती कायम राहणार आहे. कमाल तापमान 40 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता असून हवामान कोरडं राहील, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
विदर्भात 41 अंशांचा टप्पा पार
राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतेची तीव्रता अधिक असते. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान 42 अंश सेल्सियस पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. विदर्भात अकोला व चंद्रपूर येथे 4 ते 5 एप्रिल रोजी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना विशेष काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय. नागपूरमध्ये तापमानानं 40 अंशांचा टप्पा पूर्वीच पार केलाय. 3 एप्रिल रोजी नागपूरमधील तापमान 41 अंश सेल्सिअस पर्यंत जाण्याची शक्यता असून हवामान ढगाळ राहणार असल्याचं हवामान विभागानं म्हटलंय.
advertisement
मराठवाडाही तापला
मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झालीय. मार्चमध्येच तापमानानं 40 अंशांचा टप्पा ओलांडलाय. तर एप्रिल महिन्यात उष्णता आणखी वाढण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये तापमान 40 अंशांवर पोहोचलंय. 3 एप्रिलला तापमानाची तीव्रता कायम राहणार असून किमान तापमान 24 तर कमाल 40 अंशांपर्यंत राहील, असा अंदाज आहे.
दरम्यान, एप्रिल सुरू होताच राज्यातील तापमानाच्या झळा तीव्रतेने जाणवत आहेत. उष्णतेत अजून वाढ होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. दुपारी बाहेर पडणं टाळायला हवं. उन्हापासून संरक्षण होईल असे कपडे वापरावेत. उष्माघातापासून वाचण्यासाठी भरपूर पाणी प्यावं. तसंच पशु-पक्ष्यांचीही काळजी घ्यावी.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 02, 2024 8:31 PM IST








