टेकऑफनंतर 32 सेकंदात विमान कोसळले, अहमदाबाद अपघात 'मुद्दाम घडवलेली दुर्घटना'; संशयास्पद थिअरीवर सरकारचे स्पष्ट उत्तर
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Air India AI-171 Crash :एअर इंडिया एआय-171 विमान अपघाताच्या तपासाबाबत सुरू असलेल्या तर्क-वितर्कांवर AAIB ने अधिकृत स्पष्टीकरण देत माध्यमांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. तपास अद्याप सुरू असून अंतिम अहवालापूर्वी कोणताही निष्कर्ष काढू नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
नवी दिल्ली: अहमदाबादमध्ये गेल्या वर्षी घडलेल्या एअर इंडिया एआय-171 विमान अपघाताच्या तपासाबाबत माध्यमांत सुरू असलेल्या चर्चांवर अखेर एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोने (AAIB) अधिकृत भूमिका स्पष्ट केली आहे. काही वृत्तांमध्ये मांडण्यात आलेले दावे पडताळणीविना आणि केवळ अंदाजांवर आधारित असल्याचे ब्युरोने म्हटले आहे.
तपास सुरूच; निष्कर्षांबाबत घाई नको
AAIB ने स्पष्ट केले की अपघाताचा तपास अद्याप सुरू असून, या टप्प्यावर कोणत्याही व्यक्तीला किंवा कारणाला जबाबदार धरणे योग्य ठरणार नाही. माध्यमे आणि जनतेने अधिकृत निवेदनांवरच विश्वास ठेवावा आणि अंतिम अहवालाची प्रतीक्षा करावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.
विमान अपघात तपास ही अत्यंत गुंतागुंतीची आणि तांत्रिक प्रक्रिया असते. फ्लाइट डेटा रेकॉर्डर (FDR), कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर (CVR) यांचे विश्लेषण, विमानाची तांत्रिक स्थिती, हवामान, एअर ट्रॅफिक कम्युनिकेशन आणि इतर अनेक बाबींचा सखोल अभ्यास केला जातो. त्यामुळे तपास पूर्ण होण्यापूर्वी निष्कर्ष काढणे म्हणजे घाईचा निर्णय ठरेल, असे ब्युरोने सूचित केले.
advertisement
तपास पूर्णपणे पारदर्शक आणि व्यावसायिक पद्धतीने सुरू असल्याचा पुनरुच्चार AAIB ने केला आहे. सर्व तथ्यांची पडताळणी झाल्यानंतरच अधिकृत निष्कर्ष जाहीर केले जातील.
विदेशी वृत्तपत्रातील दाव्यांनंतर खळबळ
इटलीतील ‘Corriere Della Sera’ या वृत्तपत्राने दिलेल्या एका अहवालाचा हवाला देत, हा अपघात तांत्रिक बिघाडामुळे नव्हता तर ‘जाणीवपूर्वक केलेल्या कृत्याचा’ परिणाम असू शकतो, असा दावा काही माध्यमांत करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर AAIB चे स्पष्टीकरण महत्त्वाचे मानले जात आहे.
advertisement
260 जणांचा मृत्यू; टेकऑफनंतर 32 सेकंदांत दुर्घटना
गुजरातची राजधानी अहमदाबाद येथे घडलेल्या या भीषण अपघातात एकूण 260 जणांचा मृत्यू झाला होता. त्यापैकी 241 प्रवासी आणि क्रू सदस्य विमानात होते, तर 19 जणांचा मृत्यू जमिनीवर झाला. विमान बी.जे. मेडिकल कॉलेजच्या परिसरात कोसळले होते, जो धावपट्टीपासून सुमारे 1.7 किलोमीटर अंतरावर आहे.
टेकऑफनंतर अवघ्या 32 सेकंदांत विमान दुर्घटनाग्रस्त झाले. विमानातील केवळ एकच प्रवासी बचावला होता. तो 11A या आसनावर बसला होता. मृतांमध्ये परदेशी नागरिकांचाही समावेश होता.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 12, 2026 9:36 PM IST
मराठी बातम्या/देश/
टेकऑफनंतर 32 सेकंदात विमान कोसळले, अहमदाबाद अपघात 'मुद्दाम घडवलेली दुर्घटना'; संशयास्पद थिअरीवर सरकारचे स्पष्ट उत्तर







