वनताराकडून नियमांचं पालन, बदनामी करु नये, SIT रिपोर्टवर सुप्रीम कोर्टची टिपण्णी
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
वनतारा केंद्राला सुप्रीम कोर्टाने SIT अहवालानंतर क्लीन चिट दिली. अनंत अंबानी यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या वनताराचे कामकाज कायद्यानुसार असल्याचे कोर्टाने स्पष्ट केले.
कोल्हापूरच्या हत्तीणीमुळे वनतारा चांगलंच चर्चेत होतं. हे प्रकरण कोर्टापर्यंत पोहोचलं असताना आता वनताराला सुप्रीम कोर्टाकडून क्लीन चीट मिळाली आहे. SIT दाखल केलेल्या रिपोर्टवर सुप्रीम कोर्टाने महत्त्वपूर्ण टिपण्णी दिली आहे. वनताराकडून नियमांचं पालन होत आहे. त्यामुळे विनाकारण बदनामी करू नये असं म्हटलं आहे. गुजरातच्या जामनगर इथे वनतारा वन्यजीव बचाव आणि पुनर्वसन केंद्राला अखेर सुप्रीम कोर्टाने विशेष तपास पथकाच्या (SIT) अहवालानंतर क्लीन चिट दिली.
सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने ‘एसआयटी’चा अहवाल तपासल्यानंतर, वनतारा पूर्णपणे कायद्याचे पालन करत आहे; त्याला बदनाम करू नका, असे स्पष्टपणे सांगितले. यामुळे वनतारावर सुरू असलेल्या वादावर पडदा पडला आहे. न्यायमूर्ती पंकज मिठाल आणि न्यायमूर्ती पी. बी. वराळे यांच्या खंडपीठाने शुक्रवारी सादर झालेल्या या अहवालाचा सोमवारी सखोल अभ्यास केला. तपासणीनंतर, वनतारातील कामकाज पारदर्शक असून नियामक उपायांचे समाधानकारक पालन केले जात असल्याचे कोर्टाने नमूद केले.
advertisement
नेमके काय होते प्रकरण?
वनतारा केंद्रावर प्राणी खरेदीमध्ये, विशेषतः हत्तींच्या बाबतीत, कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप दोन जनहित याचिकांमध्ये (PIL) करण्यात आला होता. या याचिकांमध्ये माध्यमांतील, सोशल मीडियावरील आणि विविध वन्यजीव संघटनांच्या तक्रारींचा हवाला देण्यात आला होता.
या आरोपांची चौकशी करण्यासाठी २५ ऑगस्ट रोजी सुप्रीम कोर्टाने एका माजी न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय ‘एसआयटी’ स्थापन केली होती. याचिकाकर्त्यांपैकी एक असलेल्या सी. आर. जया सुकिन यांनी ‘वनतारा’मधील हत्तींना त्यांच्या मूळ मालकांकडे परत करण्याची मागणी केली होती. मात्र, ‘हत्तींचे अधिग्रहण कायद्यानुसार आणि सर्व नियमांचे पालन करून केले असल्यास, त्यात कोणतीही अडचण नाही,’ असे कोर्टाने स्पष्ट केले होते.
advertisement
काय आहे वनतारा केंद्र?
वनतारा हे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) आणि रिलायन्स फाउंडेशनचे संचालक अनंत अंबानी यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेले केंद्र आहे. हे जामनगर येथील रिलायन्स रिफायनरी कॉम्प्लेक्सच्या ग्रीन बेल्टमध्ये ३,००० एकर परिसरात पसरलेले आहे.
हे केंद्र वन्यजीवांच्या, विशेषतः हत्तींच्या बचाव आणि पुनर्वसनासाठी तयार करण्यात आले आहे. येथे आधुनिक निवारा, वैज्ञानिकदृष्ट्या डिझाइन केलेले बाडे, हायड्रोथेरपी पूल, जलाशय आणि हत्तींच्या संधिवातावर उपचार करण्यासाठी जकूझी यांसारख्या सुविधा आहेत. ‘वनतारा’चा उद्देश प्राण्यांना सुरक्षित आणि आरोग्यदायी वातावरण प्रदान करणे हा आहे.
advertisement
एसआयटीच्या अहवालात वनतारा’चे कामकाज पारदर्शक आणि कायद्यानुसार असल्याचे म्हटले आहे. तज्ज्ञांच्या मते, हे केंद्र भारतातील वन्यजीव पुनर्वसन क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण पाऊल असून, भविष्यात अशा सुविधांसाठी एक आदर्श मॉडेल ठरू शकते. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे ‘वनतारा’च्या कार्यावर झालेले प्रश्नचिन्ह दूर झाले आहे.
Location :
Delhi,Delhi,Delhi
First Published :
September 15, 2025 2:29 PM IST