Diabetes Myths : साखर सोडून गूळ किंवा मध खाताय? मधुमेहाच्या रुग्णांनी ही बातमी वाचल्याशिवाय गोड खाऊच नका
- Published by:Devika Shinde
Last Updated:
'डायबिटीज' किंवा मधुमेह (Diabetes) हा तर असा विषय आहे, ज्यावर इंटरनेटवर सल्ले देणाऱ्यांची कमी नाही. पण, तुम्हाला माहित आहे का? व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी आणि इंटरनेटवर फिरणारी प्रत्येक माहिती खरी नसते.
आजच्या धावपळीच्या युगात आपण आपल्या शरीरापेक्षा मोबाईलला जास्त वेळ देतो. एखादा छोटासा त्रास झाला की आपण गुगल (Google) करतो आणि तिथे मिळालेल्या अफाट माहितीच्या आधारे स्वतःचे डॉक्टर बनतो. 'डायबिटीज' किंवा मधुमेह (Diabetes) हा तर असा विषय आहे, ज्यावर इंटरनेटवर सल्ले देणाऱ्यांची कमी नाही. पण, तुम्हाला माहित आहे का? व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी आणि इंटरनेटवर फिरणारी प्रत्येक माहिती खरी नसते.
advertisement
कधी कुणी सांगतं की भात पूर्ण बंद करा, तर कधी कुणी मेथीच्या दाण्याने मधुमेह मुळापासून संपवण्याचा दावा करतं. या गोंधळात नेमके बळी पडतात ते सामान्य रुग्ण. मुंबईच्या कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयातील सल्लागार आहारतज्ज्ञ ऐश्वर्या ए. कुंभकोनी यांनी मधुमेहाशी संबंधित काही प्रचलित गैरसमज आणि त्यामागचे वैज्ञानिक सत्य उलगडले आहे. जर तुम्हाला किंवा तुमच्या घरात कुणाला मधुमेह असेल, तर हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.
advertisement
1. जास्त साखर खाल्ल्यानेच मधुमेह होतो का?लोकांचा असा समज आहे की, जो जास्त गोड खातो त्यालाच मधुमेह होतो. पण हे अर्धसत्य आहे. केवळ साखर खाणे हे मधुमेहाचे एकमेव कारण नाही. जर तुम्ही सतत रिफाईंड साखर आणि हाय कॅलरी पदार्थ खात असाल, तर वजन वाढते आणि पोटावर चरबी साठते. यामुळे शरीरात 'इन्शुलिन रेझिस्टन्स' तयार होतो आणि मग टाईप-2 मधुमेह जडतो. लक्षात घ्या, 'टाईप 1' मधुमेह हा ऑटोइम्युन आजार आहे, ज्याचा अन्नाशी थेट संबंध नसतो. त्यामुळे फक्त साखर सोडणे पुरेसे नाही, तर एकूण जीवनशैली बदलणे गरजेचे आहे.
advertisement
2. भात खाणे पूर्णपणे बंद करावे का?"मला शुगर आहे, मी भात खात नाही," असं अभिमानाने सांगणारे अनेकजण भेटतात. पण आहारतज्ज्ञांच्या मते, भात पूर्णपणे सोडण्याची गरज नाही. गरज आहे ती त्याच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवण्याची. जर तुम्ही भातासोबत जास्त प्रमाणात डाळ आणि भरपूर पालेभाज्या खाल्ल्या, तर साखरेची पातळी अचानक वाढत नाही. पांढऱ्या भाताऐवजी 'ब्राऊन राईस' किंवा हातसडीचा तांदूळ हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.
advertisement
3. मधुमेह आहे म्हणून फळे खाणे बंद केलेय?फळांमध्ये नैसर्गिक साखर असते, म्हणून अनेक रुग्ण फळे खाणे टाळतात. पण हा मोठा गैरसमज आहे. फळांमध्ये केवळ साखर नसते, तर त्यात फायबर, अँटी-ऑक्सिडंट्स आणि महत्त्वाची जीवनसत्त्वे असतात. फळांमधील फायबरमुळे साखर रक्तात शोषली जाण्याची प्रक्रिया मंदावते. त्यामुळे सफरचंद, पेरू किंवा पपई यांसारखी फळे डॉक्टरांच्या सल्ल्याने मर्यादित प्रमाणात खाणे फायदेशीरच ठरते.
advertisement
4. घरगुती नुसके आणि जडीबुटीने मधुमेह बरा होतो?मेथी दाणे, दालचिनी किंवा कोरफड खाल्ल्याने मधुमेह समूळ नष्ट होतो, असा दावा अनेकदा केला जातो. पण वस्तुस्थिती अशी आहे की, कोणताही एक पदार्थ किंवा मसाला मधुमेहावर 'जादूची कांडी' म्हणून काम करू शकत नाही. काही पदार्थ रक्तातील साखर अचानक वाढण्यापासून रोखू शकतात, पण ते तुमच्या औषधांना पर्याय ठरू शकत नाहीत. तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय औषधे बंद करून केवळ घरगुती उपायांवर अवलंबून राहणे जिवावर बेतू शकते.
advertisement
5. फक्त जाड व्यक्तींनाच मधुमेह होतो का?हा एक अत्यंत धोकादायक गैरसमज आहे. मधुमेह केवळ लठ्ठ व्यक्तींना होतो असे नाही. अनेकदा सडपातळ दिसणाऱ्या व्यक्तींच्या शरीरात अंतर्गत चरबी जास्त असू शकते, ज्यामुळे इन्शुलिनच्या कार्यावर परिणाम होतो. त्यामुळे तुमचं वजन कितीही कमी असलं, तरी नियमित तपासणी करणे महत्त्वाचे आहे.
advertisement
6. गूळ आणि मध साखरेपेक्षा सुरक्षित आहेत?साखर बंद करून लोक गूळ किंवा मधाचा वापर वाढवतात. पण तज्ज्ञ सांगतात की, साखर, गूळ आणि मध हे तिन्ही 'सिंपल कार्बोहायड्रेट्स' आहेत. हे तिन्ही पदार्थ रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढवतात. गुळात काही खनिजे असली तरी मधुमेहाच्या रुग्णांसाठी तो साखरेइतकाच सावधपणे वापरण्याचा पदार्थ आहे.
advertisement
advertisement
advertisement






