Weather Alert: संकट अजून टळलं नाही! मराठवाड्यात पुन्हा कोसळणार, छ. संभाजीनगरसह 5 जिल्ह्यांना अलर्ट
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Ravi Shivaji Shikare
Last Updated:
Marathwada Rain: मराठवाड्यात गेल्या काही दिवसांत मुसळधार पावसानं थैमान घातलं आहे. शेती पिकांचं मोठं नुकसान झालं असून जनजीवन विस्कळीत झालंय.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढतच आहे. मुसळधार पावसामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कोकण,पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यात देखील मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. आज 24 सप्टेंबर रोजी मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला असून मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांचा पुढील 24 तासांचा हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
छत्रपती संभाजीनगरसह जालना, बीड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांसाठी सतर्कतेचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान याकाळात सामान्यतः वातावरण ढगाळ राहणार असून विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. या काळात वाऱ्याचा वेग ताशी 30 ते 40 किमीपर्यंत असू शकतो. काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे, तर काही भागात मुसळधार पाऊस होईल.
advertisement
advertisement
मंगळवारी छत्रपती संभाजीनगर शहरासह फुलंब्री परिसरामध्ये मुसळधार पाऊस झाला. या मुसळधार पावसामुळे अक्षरशः शेतामध्ये आणि रस्त्यावर गुडघाभर पाणी साचले होते. तसेच सिल्लोड तालुक्यातील उंडणगाव येथे मुसळधार पाऊस झाला. एक तासाच्या पावसाने संपूर्ण जनजीवन विस्कळीत केले. जुई आणि वाघरा नद्यांना महापूर आला. नदीचे पाणी शेतांमध्ये घुसले. त्यामुळे मका, सोयाबीन, कापूस आणि भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले. अनेक शेतांमध्ये तळ्याचे स्वरूप आले. शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरले.
advertisement
छ. संभाजीनगरसह धाराशिव, परभणी, लातूर परिसरात देखील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नद्यांना पूर आला असून शेती पिके वाहून गेली आहेत. तर काही ठिकाणी जनावरे पुराच्या पाण्यात वाहून गेल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. आज पुन्हा पावसाचा इशारा असल्याने नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल. तसेच हवामान विभाग आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे लागेल.