Weather Alert: कुठं थंडीचा कडाका, तर कुठं अवकाळी तडाखा, रविवारचं हवामान अपडेट
- Reported by:Namita Suryavanshi
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Weather Alert: राज्यावर ऐन थंडीच्या दिवसांत अवकाळी संकट घोंघावत आहे. मुंबई-पुण्यासह राज्यातील रविवारचा हवामान अंदाज जाणून घेऊ.
नववर्षाच्या पहिल्या आठवड्यात मुंबई महानगर परिसरात हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून शहरावर ढग दाटल्याचे चित्र आहे. थंडीचा तीव्रता काही प्रमाणात कमी झाली असून किमान तापमानात वाढ नोंदवली जात आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 4 जानेवारी रोजीही मुंबईसह राज्यात ढगाळ ते मुख्यतः निरभ्र हवामान राहण्याची शक्यता असून, थंडी पूर्णपणे ओसरणार नसली तरी गारवा सौम्य स्वरूपात जाणवेल.
advertisement
मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरात दिवसभर हवामान स्थिर राहणार आहे. आकाश मुख्यतः स्वच्छ ते अंशतः ढगाळ राहील. मुंबईत कमाल तापमान सुमारे 32 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 18 अंशांच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. ठाणे आणि नवी मुंबईतही साधारण अशीच परिस्थिती राहणार असून सकाळी व रात्री हलका गारवा जाणवेल. पुढील काही दिवस या भागात किमान तापमानात फारसा बदल न होता सौम्य वाढ कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे
advertisement
पुणे शहर आणि पुणे ग्रामीण भागात थंडीचा जोर मागील आठवड्याच्या तुलनेत कमी झालेला दिसून येत आहे. ढगाळ वातावरणामुळे किमान तापमानात वाढ झाली असून पुण्यात किमान तापमान 14 अंश सेल्सिअस, तर कमाल तापमान 31 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. पहाटेच्या वेळी धुक्याची स्थिती कायम असून ग्रामीण भागात ही दाटी अधिक जाणवू शकते. सोलापूर जिल्ह्यात 31 अंश सेल्सिअस इतक्या उच्चांकी कमाल तापमानाची नोंद झाल्याने पश्चिम महाराष्ट्रात उष्णतेचा प्रभाव वाढत असल्याचे चित्र आहे.
advertisement
उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही हवामानात बदल जाणवत आहेत. नाशिकमध्ये कमाल तापमान 29 अंश, तर किमान तापमान 12 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर येथे कमाल तापमान 29 अंश आणि किमान तापमान 15 अंशांच्या आसपास राहील. विदर्भात नागपूरमध्ये किमान तापमान 14 अंशांपर्यंत वाढले असून ढगाळ वातावरण काही भागांत कायम राहण्याची शक्यता आहे. तरीही या विभागांत पहाटेच्या वेळी गारवा जाणवत राहील.
advertisement
एकंदरीत पाहता, 4 जानेवारी रोजी महाराष्ट्रात थंडीचा कडाका कमी होत असला तरी हिवाळ्याची चाहूल अद्याप कायम राहणार आहे. ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात वाढ दिसून येत असून पुढील काही दिवस हीच स्थिती टिकून राहण्याची शक्यता आहे. दिवसाच्या वेळेत उबदार वातावरण, तर पहाटे आणि रात्री सौम्य गारवा असा मिश्र हवामानाचा अनुभव राज्यभरात जाणवणार आहे.







