IND vs PAK: कोलंबोत रविवारी पावसाची शक्यता, भारत-पाकिस्तान मॅच होणार की नाही? हवामान विभागाने स्पष्ट सांगितले
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
India vs Pakistan T20 World Cup: कोलंबोमध्ये रंगणाऱ्या भारत–पाकिस्तान टी-20 वर्ल्डकप सामन्यावर पावसाचे सावट असून हवामान खात्याने कमी दाबाच्या क्षेत्राचा इशारा दिला आहे. राजकीय तणाव आणि हवामानाची अनिश्चितता यामुळे या हायव्होल्टेज लढतीची उत्सुकता अधिकच वाढली आहे.
ICC टी-20 वर्ल्डकपमधील भारत–पाकिस्तान हा बहुप्रतिक्षित सामना उद्या रविवारी (15 फेब्रुवारी) कोलंबोमध्ये रंगणार आहे. दोन्ही संघातील या सामन्यावरून गेल्या महिन्याभरात बराच ड्रामा झाला. बांगलादेशला स्पर्धेतून बाहेर करण्यावरून पाकिस्तानने भारताविरूद्धची मॅच खेळणार नसल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर बऱ्याच बैठका झाल्यानंतर आता ही लढत होत आहे. दोन्ही संघ आणि त्यांचे चाहते या मॅचसाठी सज्ज असताना एक मोठी अपडेट समोर आल्याने सर्वांची धडधड वाढली आहे.
advertisement
श्रीलंका हवामान विभागाने बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होण्याचा इशारा दिला असून, सामन्याच्या वेळेत पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. कोलंबोतील खेत्तरामा परिसरात रविवारी संध्याकाळी सुमारे 70 टक्के पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. “15 फेब्रुवारीच्या सुमारास दक्षिण-पूर्व बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा क्षेत्र तयार होऊ शकतो,” असे हवामान खात्याच्या निवेदनात नमूद आहे.
advertisement
advertisement
आर. प्रेमदासा स्टेडियम हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील मोजक्या मैदानांपैकी एक आहे, जिथे संपूर्ण मैदान झाकण्यासाठी कव्हर्सची सुविधा आहे. त्यामुळे पाऊस थांबल्यानंतर अवघ्या 20 मिनिटांत सामना पुन्हा सुरू करण्याची तयारी आयोजकांकडे आहे. त्यामुळे हलक्या सरी आल्या तरी सामना पूर्णपणे रद्द होण्याची शक्यता कमी मानली जाते.
advertisement
या सामन्याभोवतीचा तणाव फक्त खेळापुरता मर्यादित नव्हता. क्रिकेट आणि राजकारण पुन्हा एकदा आमनेसामने आले होते. पाकिस्तानने सुरुवातीला बहिष्काराचा पवित्रा घेतला होता; मात्र दीर्घ चर्चेनंतर त्यांनी भूमिका बदलत कोलंबोमध्ये भारताविरुद्ध खेळण्यास होकार दिला. या चर्चेत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC), बांगलादेश आणि श्रीलंका यांचाही सहभाग होता. दक्षिण आशियातील क्रिकेट समीकरणे जुळवून हा सामना प्रत्यक्षात आणण्यात आला आहे.
advertisement
advertisement
भारत संघ मधल्या फळीतील स्थैर्यावर आणि तंदुरुस्त अभिषेक शर्मावर भरोसा ठेवणार आहे. पाकिस्तानविरुद्ध वर्चस्व राखण्यासाठी संघ व्यवस्थापन सज्ज आहे. हवामानाची अनिश्चितता, राजकीय पार्श्वभूमी आणि दोन्ही संघांची प्रतिष्ठा या सगळ्यांमुळे कोलंबोतील हा सामना केवळ क्रिकेटपुरता मर्यादित राहणार नाही. पाऊस साथ देईल तरच कोट्यवधी चाहत्यांना अपेक्षित थरार पाहायला मिळणार आहे.






